महसूल अधिकाऱ्यावर भीषण हल्ला, सहकारी ठार; शिरगाव परिसरातील खदानीजवळ थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 21:31 IST2026-05-12T21:30:05+5:302026-05-12T21:31:46+5:30
विरारमध्ये दहशत आणि रक्ताचा खेळ, महसूल अधिकाऱ्यावर पाशवी हल्ला, सहकाऱ्याचा दुर्दैवी अंत

महसूल अधिकाऱ्यावर भीषण हल्ला, सहकारी ठार; शिरगाव परिसरातील खदानीजवळ थरार
मंगेश कराळे
Nalasopara Crime:विरारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले असून, विरारच्या शिरगाव परिसरात महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. वाळू माफिया किंवा जमीन प्रकरणातील वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, या भीषण घटनेत मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांचे सहकारी आत्माराम पाटील यांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर स्वतः प्रभाकर पाटील हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, शिरगाव परिसरातील एका खदानीजवळ ही थरारक घटना घडली. मंडल अधिकारी प्रभाकर पाटील आणि त्यांचे सहकारी आत्माराम पाटील हे सरकारी कामाच्या निमित्ताने या परिसरात गेले होते. मात्र, दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी अचानक त्यांच्यावर लाकडी दांडक्यांनी तुफान हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण आणि पाशवी होता की, हल्लेखोरांनी केवळ मानवी जीवच नव्हे तर त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करून आपला क्रूर हेतू स्पष्ट केला. या हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रभाकर पाटील हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने नियोजनबद्धरीत्या हा हल्ला केला, त्यावरून ही घटना पूर्वियोजित असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
महसूल विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्यावर दिवसाढवळ्या झालेला हा हल्ला म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेवर पुकारलेले खुले आव्हान मानले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागात संतापाची लाट उसळली असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जमीन जुमला, खदान किंवा अवैध खननाशी संबंधित माफियांनी हा सूड उगवला आहे का, या दिशेने आता पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शिरगाव आणि विरार परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून दोषींना लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.