आधार लिंकशिवाय खत नाही

By Admin | Updated: May 8, 2017 00:37 IST2017-05-08T00:37:24+5:302017-05-08T00:37:24+5:30

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे.

Without fertilizer, there is no fertilizer | आधार लिंकशिवाय खत नाही

आधार लिंकशिवाय खत नाही

नोंदणीकृत खत विक्री केंद्रांत लागणार पॉस मशीन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे. यातच शासनाने कृषी केंद्रातून यंदा शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक केल्याशिवाय खत मिळणार नसल्याचे धोरण ठरविले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दुकानात जाताना आधार कार्ड घेवूनच जाणे बंधनकारक झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाकडे एकूण ६०५ खत विक्रेत्यांची नोंदणी झाली. या सर्वच दुकानांत ही मशीन लागणार आहे. मशीन लावण्याच्या कामाला १५ मे पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांनाच खत मिळेत असे संकेत आहे.
या मशीनच्या वापरासंदर्भात कृषी विभाग आणि खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात देण्यात आले आहे. उर्वरीत व्यावसायिकांना येत्या १२ मे रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या पॉस मशीनची चर्चा असली तरी त्याच्या वापरावरून गोंधळ निर्माण झाला आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. वखरणी होताच खते आणि बियाण्याच्या खरेदीची शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे. अशात या पॉस मशीनच्या गोंधळामुळे घोळाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कृषी विभागाने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सबसिडीवर चाप
खत विक्री करताना कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सबसिडीचा घोळ होत होता. आता या घोळाला पॉस मशीनमुळे चाप बसणार आहे. या मशीनमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक होणार नाही तोपर्यंत खताची उचल होणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विक्री दाखवून सबसिडी उचलणाऱ्यांचे धाबे दणानले आहे.

अनेकांकडून होते धूळपेरणी
वर्धा जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता येथील शेतकऱ्यांकडून धूळपेरणी करण्यात येते. या पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना खताची गरज भासणार आहे. अशा वेळी या पॉस मशीनमुळे त्यांचे नियोजन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुबलक खत आणि बियाणे
जिल्ह्यात यंदाच्या खरीपात बियाण्याकरिता आणि खतांकरिता शेतकऱ्यांना भटकण्याची वेळ येणार नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा होणाऱ्या पेऱ्याला ७२ मेट्रीक टन खताची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली होती. यापेक्षा अधिक खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. मागणीच्या तुलनेत १.२८ मेट्रीक टन खत अतिरिक्त असल्याचे कृषी विभाकडून सांगण्यात आले आहे.
कापूस उत्पादक जिल्हा असल्याने येथे कपाशी बियाण्यांच्या ९.८० लाख पाकिटांची गरज आहे. मात्र जिल्ह्याला १६ लाख पाकिटे मिळणार आहे.

Web Title: Without fertilizer, there is no fertilizer