जलवाहिनी फुटली; पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:08+5:30
न.प. प्रशासनाचा संबंधीत बांधकाम कंत्राटदारावर वचक नसल्याने गेल्या आठवभरात जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडली. शिवाय त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण होत आहे. स्थानिक न.प. च्यावतीने साडेतीन कोटींच्या खर्चातून महादेवराव ठाकरे पुतळा ते न.प. माध्यमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूच्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : रस्त्याच्या बांधकामात न.प. पाणी पुरवठा योजनेची दहा इंच व्यासाची पाईपलाईन फुटल्याने स्थानिक इंदिरा गांधी पुतळा परिसर जलमय झाला होता. यामध्ये न.प. पाणी पुरवठा योजनेचा संपूर्ण जलसाठा खाली झाल्याने तसेच पाईपलाईन दुरूस्तीचे काम थंडबस्त्यात असल्याने येत्या तीन दिवसपर्यंत इंदिरानगर भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
न.प. प्रशासनाचा संबंधीत बांधकाम कंत्राटदारावर वचक नसल्याने गेल्या आठवभरात जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडली. शिवाय त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण होत आहे. स्थानिक न.प. च्यावतीने साडेतीन कोटींच्या खर्चातून महादेवराव ठाकरे पुतळा ते न.प. माध्यमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूच्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. संबंधीत रस्त्याचे बांधकाम दोन वेगवेगळ्या ठेकेदारांकडे सोपविण्यात आले आहे. ठाकरे पुतळा ते इंदिरा गांधी पुतळा न.प. माध्यमिक शाळा अशा पद्धतीने कामाची विभागणी करण्यात आली आहे. हा संपूर्ण भाग वर्दळीचा असताना संबंधीत ठेकेदारांची कामाची पद्धत तसेच राबत असलेल्या कामाची संथगती नारिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्ता बांधकामदरम्यान तांत्रिक बाबी जोपासल्या जात नसल्याने गेल्या आठवडाभरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या. आठ दिवसापूर्वी हजरत दिनाशावली मस्जिद ट्रस्ट समोरील जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना चार दिवसपर्यंत पिण्याचे पाणी मिळाले नाही. या दरम्यान संबंधीत ठेकेदार व न.प. पदाधिकारी यांचे दरम्यान आरोप प्रत्यारोप होवून कनगीतुरा रंगला. मंगळवारला पुन्हा इंदिरा गांधी पुतळा परिसराची मुख्य जलवाहिनी फुटल्याने अर्धा दिवसपर्यंत या भागातील नाले ढोले तुडूंब भरून वाहिले. न. प. प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व बांधकाम ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे ही जलवाहिनी फुटली. यामध्ये इंदिरा नगर व परिसरातील नागरिकांना तीन दिवसपर्यंत पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. न.प. मुख्याधिकारी पदाधिकाऱ्यांचा कार्यालयीन कामकाजासोबतच इतर बाबींवर वचक नसल्याने बेबंदशाही वाढीस लागल्याची टिका होत आहे.