नागपूर विभागात वर्धा झेडपी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:24+5:30
पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सोळा विभागाने विविध कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे प्रथम विभागीय स्तरावर गुणांकन करण्यात आले होते. गुणांकन करणाऱ्या पथकाने त्यांना गुणदान केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषद विभागातून प्रथम आली होती. त्यानंतर राज्याच्या चमुकडूनही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे गुणांकन झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून यशवंत पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी केली जाते. सन २०१८-२०१९ मध्ये वर्धा जिल्हा परिषद नागपूर विभागातून सवोत्कृष्ठ कामगिरी करणाारी पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे गुरुवारी हा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या हस्ते जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सरिता विजय गाखरे, माजी अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष वैशाली जयंत येरावार, आरोग्य व शिक्षण समिती सभापती मृणाल हेमंत माटे, महिला व बालकल्याण समिती सभापती सरस्वती राजू मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सोळा विभागाने विविध कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे प्रथम विभागीय स्तरावर गुणांकन करण्यात आले होते. गुणांकन करणाऱ्या पथकाने त्यांना गुणदान केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषद विभागातून प्रथम आली होती. त्यानंतर राज्याच्या चमुकडूनही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे गुणांकन झाले होते.
आज नागपूर विभागीय स्तरावर ही जिल्हा परिषद अव्वल आल्याने जिल्ह्याचे नावलौकीक झाले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पदाधिकाºयांचाही काम करण्याचा उत्साह वाढला आहे.
स्वच्छ भारत मिशन प्रथम तर समाजकल्याण विभाग शेवटचा
विभागीय स्तरावर झालेल्या गुणांकामध्ये जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन विभागाने उत्तम कार्य केले असून या विभागाला सात पैकी सात गुण प्राप्त झाले आहे. यासोबतच आरोग्य विभाग व रोजगार हमी योजनेचेही काम उत्तम राहिले आहे. रोजगार हमी योजनेतून शंभर टक्के रोजगार मिळवून देण्यात आला आहे. शिक्षण विभागाने शंभर टक्के पटनोंदणी, ९७ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करुन देण्यावर भर देण्यासह शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिल्याने १८ पैकी १७ गुण मिळविले आहे. सामान्य प्रशासन विभागाने नियमित सभेचे कामकाज सांभाळत ४ सभाऐवजी ७ सभांचे आयोजन करणे, सभांमध्ये ९३.९६ टक्के सदस्यांची उपस्थिती, महिला सदस्यांची मोठ्या प्रमाणात सभेला हजेरी, कर्मचारी व्यवस्थापन, विभागीय चौकशी प्रकरणाची अंतीम कार्यवाही आदी कामामध्ये तत्परता दाखविल्याने या विभागाला ६० पैकी ५५.३२ गुण प्राप्त झाले आहे. मात्र, समाजकल्याण विभागातील कामकाज ढेपाळल्याने या विभागाला सर्वात कमी १५ पैकी ८ गुण मिळाले आहे.