काश्मीरच्या लोकशाहीकरिता वर्ध्यात आत्मक्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:14+5:30
भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करुन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. या संचारबंदीने तेथील सामान्य जनतेचे जीवन हलाखीचे झाले आहे. त्या लोकांना मुक्त श्वास घेण्याकरिता लोकशाहीचा अधिकार बहाल करा, अशी मागणी वर्ध्यातील लोकशाहीकरिता समर्पित नागरिकांनी बुधवारी एक दिवस आत्मक्लेश उपवास करुन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.
भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे. त्याकरिता कश्मिरी जनतेसोबत आपण एकतेची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. ते भारतीय लोक आहेत व मनुष्य म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यांना राज्यघटनेनुसार लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आज वर्ध्यातील लोकशाही समर्पित नागरिकांनी आत्मक्लेश उपवास सत्याग्रह करुन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्फत भारत सरकारला निवेदन दिले.
विविध मागण्यांचे निवेदन देताना किसान अधिकारी अभियानचे अविनाश काकडे, सुरज पाखडे, सुनिल कोल्हे, मिलिंद मोहोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, प्रीतेश चोरे, प्रमोद हजारे, हरिष नान्दे, रिजवान पठाण, विलास अमझीरे, धनराज अमझीरे, लक्ष्मण नांदणे, ज्ञानेश्वर ढगे, नूतन माळवी आदींची उपस्थिती होती.
या आहेत मागण्या
सर्व पक्ष आणि संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांना नजर कैदेतून मुक्त करावे, सर्व समाजमाध्यमे व दुरध्वनी सेवा सर्वांसाठी मुक्त करावी व जम्मु कश्मिरला पूर्ण राज्याचा दर्जा पूर्ववत देण्यात यावा, या तीन प्रमुख मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांसाठी आज वर्ध्यात दिवसभर आत्मक्लेश उपवास करण्यात आला.