कांजण्या, गालगुंडची पसरतेय साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:09+5:30
कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वातावरणात बदल होताच जिल्ह्यात संसर्गजन्य असलेल्या कांजण्या आणि गालगुंड आजाराने डोके वर काढले असून लहान मुलांमध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो. ‘मम्प्स’ अर्थात गालगुंड हा पसरणाऱ्या विषाणूंपासून होणारा संसर्ग असून लहान मुलांमध्ये याचे मोठे प्रमाण आहे. या आजाराचा विषाणू तोंडावाटे अथवा नाकावाटे हवेण्या कणांमार्फत प्रवेश करतो. आणि हवेवाटे पसरतो. विषाणूच्या संसर्गाच्या १४ ते २५ दिवसांनंतर गालगुंडची लक्षणे जाणवतात. बाधित व्यक्तीला त्याचे तोंड आणि नाक शिंकताना आणि खोकताना इतर व्यक्तीला संसर्ग पसरू नये म्हणून झाकून ठेवणे गरजेचे आहे. गालगुंडची सुजलेला नाजूक जबडा, डोकेदुखी, स्रायूंचे दुखणे, जबड्यामध्ये सूज येणे, तोंड कोरडे पडणे, भूक कमी होणे, ताप, अशक्तपणा, वृषणांमध्ये दुखणे, चिडचिडेपणा ही तर ताप येणे, डोकेदुखी, मरगळ, कमी भूक लागणे, हलकेसे पोट दुखणे, अस्वस्थता अशी कांजण्या आजाराची लक्षणे आहेत.
जिल्हा रुग्णालयात अद्याप रुग्ण नाहीत
जिल्ह्यात या आजाराने डोके वर काढले असले तरी सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण दाखल झालेले नाहीत, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल येळणे यांनी दिली.
कांजण्या आणि गालगुंड हे दोन्ही संसर्गजन्य आजार असून संपर्कातून या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होतो. शहरात या आजाराचे रुग्ण आढळून येत असून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. याकरिता पालकांनी पाल्याला आजारी असताना शाळेत पाठविणे टाळावे, जेणेकरून आजाराचा फैलाव होणार नाही. बाधित व्यक्तीने आवश्यक औषधोपचार घेत पाण्याने अंग पुसावे, भरपूर पाणी प्यावे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. सचिन पावडे, बालरोगतज्ज्ञ, वर्धा.