सोशल डिस्टन्सिंग नॉर्मल मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:01+5:30
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी कोरानाला रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर कार्य करीत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. पण, सध्या बहुतांश ठिकाणी याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. दिवस उजाडताच वर्धेकर रस्त्यावर गर्दी करीत असल्याने अजुनही कोरोना आजाराबाबत नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
त्यामुळे शहरातील किराणा, औषधी, धान्य, भाजीपाल्याची दुकाने सुरु आहे. यासोबतच पेट्रोलपंपही सुरु असून आता सोमवार व मंगळवारी इलेक्ट्रिक आणि ऑटोमोबाईचे दुकान सुरु ठेवण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे. या ठिकाणी गर्दी टाळण्याकरिता सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करणे बंधनकारक केले आहे. मात्र, मंगळवारी ठिकठिकाणी याची पूर्णत: वाट लागल्याचे दिसून आहे. शहरातील दोन ठिकाणी असलेल्या भाजीबाजारात ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हेच चित्र बजाज चौकातील पेट्रोलपंपावरही होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि स्वावलंबी शाळेच्या मैदानावर भाजी व फळबाजार सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी दुकानदारांनी चुन्याने बॉक्स तयार केले होते. आता दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे हे बॉक्स दिसेनासे झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नव्याने बॉक्सची आखणी करण्यात आली नाही. परिणामी याचाच फायदा बेफिकरे वर्धेकर घेताना दिसून येत आहे.
ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांकडून वारंवार सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासंदर्भात पेट्रोलपंप मालक व दुकानचालकांना सूचना केल्या जात असतानाही कानाडोळा होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनानंतरही वर्धेकरांनी सध्यातरी कोरानाच्या प्रकोपात सोशल डिस्टन्सिंगला नॉर्मल मोडवर टाकल्याचे दिसून येत आहे.
शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच सुरु होतेय वाहनांची वर्दळ
कोरोना आजार हा महत्त्वाच्या टप्प्यात असताना प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पण, वर्धेकर अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. मंगळवारी ऑटोमोबाईल, भाजीबाजारासह शहरातील मुख्य मार्गाने दुपारपर्यंत वाहनांची चांगलीच वर्दळ पहावयास मिळाली. निर्मल बेकरी मार्ग व शनिमदिर मार्गावरही वाहनांची चांगलीच गर्दी होती. बजाज चौकातील पेट्रोल पंपावरही वाहन चालक सामाजिक अंतर न पाळता गोळा झाले होते. त्यामुळे आता तरी सतर्क होण्याची गरज आहे.