आठ महिन्यांत पोलिओ संशयित नऊ प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:15+5:30
भारताला २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. असे असले तरी २०१३ मध्ये बीड जिल्ह्यात पोलिओचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाने नव्या जोमाने प्रयत्न करून पोलिओला हद्दपार केले.
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलिओमुक्त देश म्हणून भारताला जाहीर करण्यात आले असले तरी पोलिओ या आजाराची लागण कुणाला होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. शिवाय विशेष लसीकरण मोहीम राबविली जाते. मागील आठ महिन्यांच्या कालावधीत पोलिओ संशयित नऊ केसेस जिल्ह्यात आढळले. या नऊ रुग्णांचे शौच नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. हे सर्व नमुने ‘निगेटिव्ह’ असल्याचे पुढे आले आहे.
भारताला २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. असे असले तरी २०१३ मध्ये बीड जिल्ह्यात पोलिओचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाने नव्या जोमाने प्रयत्न करून पोलिओला हद्दपार केले. १५ वर्षाखालील बालकांना अर्धांगवायूचा झटका आल्याव व प्रकृती खालवल्यास त्याच्या शौचाचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविले जातात. जानेवारी २०१९ ते आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातून एकूण नऊ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ही नमुने तपासणीत ‘निगेटिव्ह’ असल्याचे पुढे आले असल्याचे सांगण्यात आले.
खासगी रुग्णालयांना माहिती देणे बंधनकारक
पोलिओ संशयित रुग्ण एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर शासकीय यंत्रणेला त्याची माहिती वेळीच व तातडीने मिळत नव्हती. ही बाब पुढे आल्यावर आरोग्य यंत्रणेकडून खासगी रुग्णालयांनी ही माहिती देण्याच्या अनुषंगाने बंधनकारक करण्यात आले आहे.
वर्षातून दोनवेळा राबविली जाते मोहीम
पाकिस्तान, अफगानिस्तान व बांगलादेश येथे आजही मोठ्या प्रमाणात पोलिओचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार भारतात होऊ नये म्हणून वर्षातून किमान दोन वेळा देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येते. विषेश म्हणजे २०१३ नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना देतात पोलिओची प्रतिबंधक लस
पोलिओमुक्त भारत हा उद्देश कें्रदस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण भारतात राष्ट्रीय स्तरावर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते. प्रत्येक बालकाला पोलिओची लस द्याच, असे आवाहन चित्रपट जगतातील महानायक अभिताभ बच्चन हे करतात.
आठवडाभराचा लागतो वेळ
१४ दिवसात संशयिताचा शौच नमुना घेऊन तो तपासणीकरिता मुंबई येथे पाठविला जातो. अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असल्यास त्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला तातडीने माहिती दिली जाते. तर इतर वेळी अहवाल मिळण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी लागत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारत देश २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे. २०१८ मध्ये पाकिस्तान मध्ये १२ तर अफगानिस्तान मध्ये २१ पोलिओच्या केसेस पुढे आल्या. तसेच २०१९ मध्ये पाकिस्तानात ५३ तर अफगानिस्तानात १३ केसेस आढळल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत पोलिओचा प्रसार होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली. शिवाय पुढेही यशस्वी करण्यात येईल. पाठविण्यात आलेले नऊ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.