कोरोनाशी निपटण्यासाठी ‘खाकी’ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:14+5:30
वर्धा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात हात स्वच्छ धुण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी मास्क उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच मास्क उपलब्ध होईल असा विश्वास नेहमी दक्ष राहणाऱ्या पोलीस विभागाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यभर कोरोना या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरानाची लागण झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात प्रमुख ठिकाणी नागरिकांनी गर्दी होणार नाही तसेच कोरोनाबाबत कुठलीही अफवा पसरू नये म्हणून पोलिसांनीही कंबर कसली आहे.
वर्धा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात हात स्वच्छ धुण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी मास्क उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच मास्क उपलब्ध होईल असा विश्वास नेहमी दक्ष राहणाऱ्या पोलीस विभागाला आहे.
कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ तसेच पानठेले आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी सध्या पोलीस विभागाच्यावतीने केली जात आहे. तर कोरोनाबाबत कुणी सोशल मीडियावर अफवातर पसरवीत नाही ना, यावरही पोलिसांची करडी नजर आहे.