लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासात जिल्ह्यात ४१३.२१ मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस समुद्रपूर तालुक्यात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतशिवारही जलमय झाले असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ३४.६१ मि.मी., सेलू ५८.८० मि.मी., देवळी ३६.६० मि.मी., हिंगणघाट ५५.२८ मि.मी., समुद्रपूर १०१.४१ मि.मी., आर्वी ४०.६१ मिमी, आष्टी ३९.४० मि.मी. तर कारंजा तालुक्यात ४६.५० मि.मी. पाऊस झाला. उसंत घेऊन सुरू असलेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनी ठरत असला तरी अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. समुद्रपूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे नेमके किती नुकसान झाले, याची माहिती सध्या कृषी व महसूल विभाग गोळा करीत आहे.
तळेगाव-रानवाडी मार्गावरील पूल गेला वाहून
- तळेगाव (श्या.पंत.) : परिसरात झालेल्या दमदार पावसादरम्यान नाले व नदींच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली. अशातच नाल्याच्या पुरात रानवाडी-तळेगाव मार्गावरील पूल वाहून गेला. यामुळे रानवाडी या गावाचा तळेगाव या गावाशी संपर्क तुटला आहे. वेळीच पुलाच्या दुरूस्तीची गरज आहे.- रानवाडी तसेच परिसरातील नागरिकांना विविध कामांसह साहित्य खरेदीसाठी तळेगाव (श्या.पंत.) येथे यावे लागते. परंतु, पूलच वाहून गेल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. वाहून गेलेल्या पुलाचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तो तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.