जिल्ह्याने दोन महिलांना दिली विधानसभेत जाण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:34+5:30
प्रभाराव यांना ४० हजार ४९९ मते मिळाली, तर फॉरवर्ड ब्लॉककडून लढणारे मोतीलाल कपूर यांना १२ हजार २४८ मते मिळाली. त्यानंतर १९७८ ला पुन्हा प्रभाराव याच मतदार संघातून निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना कॉँग्रेस (इं) तिकिटावर ५७ हजार ८२७ मते मिळाली. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा प्रभाराव भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स) कडून मैदानात उतरल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून वर्धा जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये दोन महिलांना मतदारांनी विधानसभेत जाण्याची संधी दिली. त्यांनी या जिल्ह्याचे नेतृत्व करीत आपली राजकारणावर छाप सोडली. १९७२ च्या निवडणुकीत पुलगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर प्रभाराव पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. यावेळी त्यांची लढत अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेदवारासोबत झाली.
प्रभाराव यांना ४० हजार ४९९ मते मिळाली, तर फॉरवर्ड ब्लॉककडून लढणारे मोतीलाल कपूर यांना १२ हजार २४८ मते मिळाली. त्यानंतर १९७८ ला पुन्हा प्रभाराव याच मतदार संघातून निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना कॉँग्रेस (इं) तिकिटावर ५७ हजार ८२७ मते मिळाली. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा प्रभाराव भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स) कडून मैदानात उतरल्या. या निवडणुकीत त्यांचा माणिकराव महादेव सबाने यांनी पराभव केला. माणिकराव सबाने भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (इं) चे उमेदवार होते. प्रभाराव यांना १३ हजार ७२५ तर माणिकराव सबाने यांना ४१ हजार ६२६ मते मिळाली. त्यानंतर १९८५ ला पुन्हा पुलगाव मतदारसंघातून प्रभाराव मैदानात उतरल्या.
या निवडणुकीत प्रभाराव यांनी कॉँग्रेस (एस)चे वसंतराव कार्लेकर यांचा पराभव केला. प्रभाराव यांना ३९ हजार ४१९ मते होती , तर कार्लेकर यांना १९ हजार ९०९ मते मिळाली. त्यानंतर १९९० च्या निवडणुकीत पुन्हा प्रभाराव रिंगणात उतरल्या. मात्र, या निवडणुकीत जनता दलाच्या सरोज काशीकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर १९९५ मध्ये पुन्हा प्रभा राव भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसकडून निवडून आल्या. त्यावेळी प्रभाराव यांनी ४३ हजार १४८ मते मिळाली. या निवडणुकीत सुरेश बापूराव देशमुख यांनी अपक्ष झुंज दिली. त्यांना २५ हजार ५९७ तर सरोज काशीकर यांना २२ हजार ३८२ मते मिळाली. प्रभाराव निवडून आल्यात. ही प्रभाराव यांची ही शेवटची निवडणूक ठरली. वर्धा जिल्ह्यातून एकट्या पुलगाव मतदारसंघातूनच प्रभाराव व सरोज काशीकर या दोन महिलांना विधानसभेत जाण्याची संधी मतदारांनी दिली.
चारही मतदारसंघांमध्ये लढल्या अनेक महिला उमेदवार
वर्धा- विधानसभा, लोकसभेत महिलांसाठी कुठलेही आरक्षण नसताना जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघात अनेक महिलांनी अपक्ष निवडणूक लढवून आपले अस्तित्व दाखवून दिले. कॉँग्रेसकडून लढणाऱ्या प्रभाराव तीनवेळी पुलगाव मतदारसंघातून विजयी झाल्यात, तर याच मतदारसंघातून एकदा मतदारांनी सरोज काशीकर यांना संधी दिली. १९८५ मध्ये पुलगाव मतदारसंघातून निर्मला राजेंद्रप्रसाद पाठक यांनी निवडणूक लढविली. याशिवाय १९९० मध्येच वर्धा मतदारसंघातून सुमित्रा नारायण चिडाम या महिलेनीही निवडणूक लढविली. तसेच हिंगणघाट मतदारसंघातून ललिता मधुसूदन कटारिया यांनीही निवडणूक लढविली. आर्वी मतदारसंघातून याच निवडणुकीत ज्योती विजय खोंडे यांनीही निवडणूक लढविली. १९९५ मध्ये देवळी मतदारसंघात प्रभा राव व सरोज काशीकर या दोन उमेदवार मैदानात होत्या. १९९९ च्या निवडणुकीत वर्धा मतदारसंघातून कांता देवराव नैताम यांनी तर याच मतदारसंघात सुशीलाबाई राधेश्याम सराफ यांनीही निवडणूक लढविली. हिंगणघाट मतदारसंघात प्रभाताई सुरेश रघाटाटे, शांताबाई महादेव शेंडे या दोन महिला रिंगणात होत्या. पुलगाव मतदारसंघात कौशल्याबाई पोपेश्वर गजभिये यांनी निवडणूक लढविली. २००४ मध्ये हिंगणघाट मतदारसंघात प्रा. सुरेखा अशोक देशमुख यांनी निवडणूक लढविली तर पुलगाव मतदारसंघातून चंद्रकला सिद्धार्थ डोईफोडे, सरोज काशीकर, सिमंतीनी रामभाऊ हातेकर यांनी निवडणूक लढविली. याशिवाय वर्धा मतदारसंघातून मंदा बाबाराव कोंबे, सुनीता भाष्कर इथापे यांनी निवडणूक लढविली. २००९ मध्ये आर्वी मतदारसंघातून प्रिया अशोक शिंदे तर देवळी मतदारसंघातून शोभा विश्वनाथ पोपटकर या निवडणूक लढल्या. २०१४ मध्ये हिंगणघाट मतदारसंघातून लता नरहरी थूल व उषाकिरण अरूण थुटे यांनी वर्धा जिल्ह्यातून निवडणूक लढविली.