व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिलेला धनादेश अनादरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:12+5:30
या हंगामात अनेक व्यापाऱ्यांच्या सहभागातून देवळीच्या धान्य मार्केटने चांगली उसळी घेतली आहे. याठिकाणी हजारो क्विंटल सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन बऱ्यापैकी भावही दिले जात आहे. परंतु काही व्यापाऱ्यानी याचा गैरफायदा उचलण्याचाही प्रकार चालविण्याचे या घटनेवरुन निदर्शनास आले आहे. येथील धान्य परवानाधारक व्यापारी चित्रा सुरेंद्र जावंधिया यांच्या नावे भिमराव शिवाजी राऊत रा. पुलगाव या शेतकऱ्याचे २८.५० क्विंटल सोयाबीन लिलाव पद्धतीने खरेदी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शेतकऱ्याने विकलेल्या सोयाबीनच्या मोबदल्यात धान्य परवानाधारक व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला १ लाखाचा धनादेश देण्यात आला. त्या धनादेशावर व्यापाऱ्याने चुकीची स्वाक्षरी केल्याने बँकेत तो धनादेश वटलाच नाही. त्यामुळे व्यापाऱ्याने जाणीवपूर्वक चुकीची स्वाक्षरी करुन वेळ मारुन नेण्याचा प्रकार चालविला आरोप शेतकऱ्याने केला असून यासंदर्भात शेतकऱ्याने पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्याकडे तक्रार केली आहे.
या हंगामात अनेक व्यापाऱ्यांच्या सहभागातून देवळीच्या धान्य मार्केटने चांगली उसळी घेतली आहे. याठिकाणी हजारो क्विंटल सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन बऱ्यापैकी भावही दिले जात आहे. परंतु काही व्यापाऱ्यानी याचा गैरफायदा उचलण्याचाही प्रकार चालविण्याचे या घटनेवरुन निदर्शनास आले आहे. येथील धान्य परवानाधारक व्यापारी चित्रा सुरेंद्र जावंधिया यांच्या नावे भिमराव शिवाजी राऊत रा. पुलगाव या शेतकऱ्याचे २८.५० क्विंटल सोयाबीन लिलाव पद्धतीने खरेदी करण्यात आले. प्रतिक्विंटल ३ हजार ७०५ रूपये या दराप्रमाणे भिमराव राऊत यांना व्यापाऱ्याकडून १ लाख ३ हजार ६७८ रूपये घ्यावयाचे होते. त्यामुळे या व्यापाऱ्याने ३ हजार ६७८ रूपये रोख देऊन २३ नोव्हेंबरला उर्वरीत एक लाखाचा धनादेश दिला. हा धनादेश शेतकऱ्यांने बँकेत जमा केला असता तो वटला नसल्याने परत टपाली शेतकऱ्याला पाठविण्यात आला. त्यामध्ये धनादेशावरील व्यापाऱ्याची स्वाक्षरी चुकल्याचे कारण देण्यात आले.
बाजार समितीने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे हा धनादेश २४ तासाच्या आत वटून शेतकऱ्याला पैसे मिळणे बंधनकारक होते. परंतु अद्याप धनादेशही वटला नाही व व्यापाऱ्याने शेतकऱ्याला पैसेही दिले नाही. त्यामुळे व्यापाऱ्याकडून हा प्रकार जाणीवपूर्वक केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याने सभापती मनोहर खडसे यांच्याकडे केली आहे.
येथील परवानाधारक व्यापारी चित्रा सुरेंद्र जावंधिया यांनी शेतकरी भीमराव राऊत यांना दिलेला एक लाख रुपयाचा धनादेश वटला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांने तक्रार केल्यानंतर व्यापाऱ्याला बोलाविण्यात आले. शेतकऱ्यांच्या या रक्कमेवर साडेबारा टक्के व्याजदराने शुक्रवारी रक्कम देण्याचे आश्वासन व्यापाऱ्याने दिले आहे.
- मनोहर खडसे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.