आर्वीतील अवलिया, गरिबांचा अन्नदाता हरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:14+5:30
महादेव धुर्वे (७५) असे या अवलियाचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा आप्तपरिवार आहे. अतिशय साधी राहणी, गोड वाणी हेच त्यांचे धन होते. झोपडीवजा त्यांची खानावळ जय सेवा अखंड भोजनालय असे त्याचे नाव. तीन चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालू असायचा. त्यांच्या भाकरीची लज्जतच न्यारी होती. दररोज तीनशे भाकरी करायच्या. आर्वी परिसरातील असा एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी महादेव धुर्वे यांच्याकडे भाकरी घेतलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : गरीब असो की श्रीमंत, त्यांच्याकडे मध्यरात्रीनंतर अन् केव्हाही कुणीही व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीला तेवढ्या रात्री पैसे असो अथवा नसो, मनापासून पोटभर जेवण देणारा सामाजिक बांधिलकी जोपासणारा आर्वीचा अन्नदाता हरविला आणि त्यांचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला.
महादेव धुर्वे (७५) असे या अवलियाचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा आप्तपरिवार आहे. अतिशय साधी राहणी, गोड वाणी हेच त्यांचे धन होते. झोपडीवजा त्यांची खानावळ जय सेवा अखंड भोजनालय असे त्याचे नाव. तीन चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालू असायचा. त्यांच्या भाकरीची लज्जतच न्यारी होती. दररोज तीनशे भाकरी करायच्या. आर्वी परिसरातील असा एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी महादेव धुर्वे यांच्याकडे भाकरी घेतलेली नाही.
आर्वीत कुणीही आले तर विश्रामगृहावर महादेवजींच्या भाकरी मागवायचे. त्यांनी एका परप्रांतीय महिलेसह एका मतिमंद महिलेच्या मुलीला दत्तक घेतले होते. तिचा सांभाळ करीत शिकविले. चार-पाच वर्षांपूर्वीच विवाह करून दिला. एका अनाथ मुलालाही त्यांनी शिकवले, मोठे केले. तो आता नोकरीत आहे.
नगराध्यक्षपक्षाचा कधीच गैरवापर केला नाही. साधी राहणी उच्च विचारसरणी त्यांची होती. आदिवासी समाजातील ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. स्व. व्यंकटेश आत्राम यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी होते. आर्वी शहरातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात ३८ वर्षांपासून अखंड शहीद स्वातंत्र्यवीर गोंड महाराज शंकरशहा मडावी, रघुनाथ शहा मडावी, पिता-पुत्राचा बलिदान दिन साजरा करणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. पोलीस ठाण्यात खुराक त्यांच्याचकडून जायची.
अशा या अन्नदात्यास काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, पीरिपा, गोंडवाना एकता परिषद, भोलेश्वर आदिवासी बहुउद्देशीय संस्था, महाराणी हिराई आदिवासी बचत गट, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, नगरपालिकेचे पदाधिकारी-कर्मचारी, सर्व सामाजिक संघटना, डॉक्टर, व्यापारी, आर्वी तालुका प्रेस क्लब, पत्रकार समिती, पोलीस विभाग संघटना आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.