लॉकडाऊन काळात ३७ दिवसात तब्बल २६६ विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:33+5:30
तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली.
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एन हंगामात लॉकडाऊन होते. दरम्यानच्या ३७ दिवसांच्या काळात कुठलाही थाटमाट न करता तब्बल २६६ विवाह पार पडले. यामुळे लग्नसमारंभांवर होणारा लाखो रुपयांचा चुराडा वाचला.
मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने लग्नसराईचे. मात्र या महिन्यातील सर्व विवाहच लॉकडाउन काळात लॉक झाले. मंगल कार्यालय, बँड बाजा, वराती, घोडा गाडी, आचारी, भोजन, दुकाने, ब्युटीपार्लर आदींवर बंदी घालण्यात आली. सर्वच ठप्प झाले. या लॉकडाऊनची गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली.
तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली. तालुक्यात पहिली परवानगी टाकळी निजामपूर येथील विवाह सोहळ्यास देण्यात आली होती. तेव्हापासून तर आतापावेतो परवानगीनंतर ३७ दिवसात तब्बल २६६ विवाहसोहळे पार पडले. आजघडीला एका विवाह सोहळ्यास कमीतकमी साधारण ३ ते ५ लाखांचा खर्च येतो. कोरोनाने विवाह सोहळ्यांवर होणारा हा अनाठायी वाचला. तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार दीपक काळुसे, श्रीधर मोहोड, सुभानखाँ पठाण यांच्या पथकाने या विवाह सोहळ्याची सर्व कागदपत्रे तपासून परवानगी दिली. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत काहीही अडचण न येता व्यवस्थितपणे सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करून २६६ विवाह पार पडले.