“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:27 IST2026-04-20T11:27:56+5:302026-04-20T11:27:56+5:30
Brijbhushan Sharan Singh News: जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली, असे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
Brijbhushan Sharan Singh News: तुम्ही हवे तर आणखी १७५ वर्षे आरक्षण घ्या. परंतु, आम्हाला याची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही अनेक पारंपरिक समुदाय अजूनही विकासापासून दूर आहेत, असे भाजपा नेते बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. परशूराम जयंतीच्या निमित्ताने अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमात बृजभूषण सिंह बोलत होते.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आरक्षणाच्या प्रभावावर बृजभूषण सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्या संबोधनात मंडल आयोगाचा विशेष उल्लेख केला. या आयोगामुळे काही समाजांना फायदा झाला असला तरी, कुंभार, सुतार आणि तेल व्यावसायिक यांसारख्या पारंपरिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या समाजांना अजूनही अपेक्षित विकास साधता आलेला नाही. देशात आरक्षण पद्धती लागू असली तरी समाजाचा एक मोठा वर्ग मागे राहिला आहे. आर्थिकदृष्ट्या सशक्त वर्ग आणि मागे पडलेले वर्ग यांच्यातील दरीवर गंभीर चिंतन करण्याची गरज असल्याचे बृजभूषण सिंह यांनी अधोरेखित केले.
जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली
संविधानाच्या निर्मितीवर बृजभूषण सिंह यांनी भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह २४२ खासदारांनी मिळून संविधान तयार केले होते. जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली आहे. मी कोणत्याही समाजाचे विरोधक नाही, परंतु, समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळण्याला समर्थन देतो, असेही ते म्हणाले. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम हे 'समाजसेवक' असल्याचे सांगत सिंह यांनी त्यांचे स्मरण केले.
दरम्यान, सामाजिक संतुलन राखणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे बृजभूषण सिंह यांनी अधोरेखित केले. या वक्तव्यामुळे आरक्षण आणि जातीय राजकारणावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.