“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:52 IST2026-04-20T12:48:31+5:302026-04-20T12:52:32+5:30
CM Devendra Fadnavis PC News: महिला आरक्षण विधेयक २०२९ ला लागू होईल. महिला सगळ्यांना वठणीवर आणतील, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले.

“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis PC News: उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघड करू. आम्ही महिलांचे एकत्रीकरण करणार आहोत. लोकशाहीत जनमताचा रेटा यांच्या लक्षात येईल, तेव्हा हे महिला आरक्षणाला पाठिंबा देतील. महिलांना संघटित करण्याचे काम करण्यासह राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत, जनजागृती करणार आहोत. आम्ही मेळावा बोलावला आहे. तिथे आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित करू. महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत नामंजूर झाल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली. गृहमंत्र्यांनी सांगितले आम्ही बदल करतो, तुम्ही पाठिंबा द्यावा. विरोधकांची बोलती बंद झाली. भाजपावर आरोप केले. राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा ठिकाणी भाजपाने महिला मुख्यमंत्री दिले . या लोकांनी कधीही याठिकाणी महिलांना मुख्यमंत्री बनू दिले नाहीत. माझ्या स्तरावरील कोणत्याही नेत्याने माझ्याशी खुली चर्चा करावी. माझे आव्हान आहे. मात्र, ते करणार नाहीत. ते पळून जातात, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
महिला आरक्षण विधेयक २०२९ ला लागू होईल
मूळात वेगवेगळी कारणे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. महिला आरक्षण विधेयक २०२९ ला लागू होईल. महिला सगळ्यांना वठणीवर आणतील, असे फडणवीस यांनी सांगितले. प्रियंका गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांना दोष देणार नाही, त्या नवीन आहेत. २०२३ नंतर आल्या आहेत. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर केले तेव्हा डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण लागू होऊ शकत नव्हते. प्रियांका गांधी यांना कदाचित हे समजावून सांगितले नसेल. ओबीसी जनगणना ठरलेली आहे. मोदी सरकारने जात जनगणना मान्य केली आहे. ओबीसी यांच्याबद्दल इतके प्रेम होते तर १९७० नंतर ओबीसी जनगणना करा, असे वारंवार सांगूनही त्यांनी काही केले नाही. दुसरीकडे, सगळ्या राज्यात सारख्या जागा वाढत आहेत. जितके टक्के तिकडे आहेत तितकेच इकडे आहे. मूळात वेगवेगळी कारणे शोधण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम
महात्मा फुले यांची २०० वी जन्मशताब्दी सुरु आहे. परंतु महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम झाले. हे सगळे पक्ष एक्सपोज झाले आहेत. देशातील सामाजिक आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचा देश ठरेल, अशी अपेक्षा होती. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होते. सर्वजण मदत करतील, अशीही अपेक्षा होती. पण डीएमके, एनसीपी शरद पवार गट, समाजवादी, ठाकरे गट, काँग्रेस यांनी महिला मानसिकतेचे प्रदर्शन केले. लोकसभेत ५४३ जागा भारताच्या संसदेत असतील, असे १९७१ मध्ये ठरले होते. तेव्हा लोकसंख्या ४५ कोटी होती आणि आता १४० कोटी लोकसंख्या आहे. पिपल्स रिप्रेशेन्टेशन ॲक्टसोबत प्रतारणा होईल. उत्तर आणि दक्षिण वाद संपवण्याचे प्रयत्न या विधेयकात केले होते. काँग्रेस आणि साथीदारांची नेहमीच अशी प्रवृत्ती राहिली आहे. सातत्याने महिला विरोधी भूमिका घेतली, या शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, खरे म्हणजे एखादा व्यक्ती किती खोटे बोलू शकतो, याचे ऑलिम्पिक घेतले, तर राहुल गांधींशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही, सगळी गोल्ड मेडल राहुल गांधींना मिळतील. संविधान तयार झाले, तेव्हा डिबेट झाल्या. तेव्हा महिला रिप्रेशेन्टेशन संदर्भात बाबासाहेब आंबेडकर चिंतेत होते. राहुल गांधी यांना महिला आणि इतर घटकांचा अपमान करणे हा छंद आहे, या शब्दांत फडणवीसांनी निशाणा साधला.