अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 18:39 IST2026-05-17T18:39:37+5:302026-05-17T18:39:52+5:30
त्यांच्या या निर्णयामुळे सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे...

अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
ठाणे : न्यायासाठी आवाज उठवणे हेच कलाकाराचे खरे कर्तव्य असल्याची ठाम भूमिका घेत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात घडलेल्या एका प्रकरणात न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर पुरस्कार परत ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या निर्णयामुळे सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेला शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतल्याने सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पुण्यात घडलेल्या एका प्रकरणात न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी पुरस्कार परत करणार असे सांगितले होते. यावेळी उषा चव्हाण भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. “कलाकार म्हणून आयुष्यभर लोकांचे प्रेम मिळाले, शासनाने सन्मान दिला; मात्र अन्याय होत असताना गप्प बसणे मला मान्य नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे समजते. आनंदाश्रम येथे शिवसैनिक आणि चाहत्यांची उपस्थिती होती. उषा चव्हाण यांनी आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख करत, “दिघेसाहेबांनी नेहमीच सामान्यांना न्याय देण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांच्या प्रतिमेसमोर हा निर्णय जाहीर करत आहे,” असे सांगितले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत त्या लवकरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरणात न्याय मिळावा आणि शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्या करणार असल्याचे सांगितले जात आहे. उषा चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून, कलाकारांनी सामाजिक प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.