कल्याण : कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना केल्या. सन्मानपूर्वक जागावाटप झाले तर मनपा निवडणूक महाविकास आघाडीतून लढू अन्यथा स्वबळावर लढण्यासाठीही सज्ज राहा, असेही त्यांनी सांगितले.
केडीएमसीची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होती. परंतु, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने निवडणूक कधी होईल, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, यापूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये मुंबईत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली होती. यावर पक्षाचे कोकण विभाग प्रभारी बी. एन. संदीप यांनी वॉर्डनिहाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा, अशी सूचना जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांना केल्या होत्या. त्याप्रमाणे अहवालही सादर करण्यात आला आहे. परंतु, कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही.
दरम्यान, मुंबईतील राजीव गांधी भवनमध्ये बुधवारी पटोले यांनी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तीन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याला मत मांडण्याची संधी देण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद कमकुवत आहे, त्यामुळे स्थानिक समस्यांवर भर देत जनसंपर्क वाढवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत, अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. मनपा निवडणुकीच्या वेळी विशेष लक्ष घालणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला सचिन पोटे, ब्रीज किशोर दत्त, कांचन कुलकर्णी, संतोष केणे, प्रकाश मुथा, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, सदाशिव शेलार, नवीन सिंग आदी उपस्थित होते.
---------
पक्ष वाढवण्याचे आव्हान
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने २००५ मध्ये केडीएमसीत अडीच वर्षे का होईना सत्तेत असलेल्या काँग्रेसची कालांतराने अधोगती झाली. महापालिका निवडणुकीत १९९५ मध्ये काँग्रेसचे १६,२००० मध्ये १८, २००५ मध्ये २१,२०१० ला १५ तर, २०१५च्या निवडणुकीत तर अवघे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढविणे आणि अधिकाधिक नगरसेवक निवडून आणणे हे आव्हान स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पटोलेंच्या पुढेही राहणार आहे.
------------------