८५ लाख प्रवाशांचा ‘सारथी’ अहोरात्र दडपणाखाली
By अनिकेत घमंडी | Updated: May 18, 2026 07:43 IST2026-05-18T07:43:38+5:302026-05-18T07:43:49+5:30
- अनिकेत घमंडी प्रतिनिधी ल्या तीन वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलचा वक्तशीरपणा ढासळला आहे. याचा थेट फटका चाकरमान्यांना ...

८५ लाख प्रवाशांचा ‘सारथी’ अहोरात्र दडपणाखाली
- अनिकेत घमंडी
प्रतिनिधी
ल्या तीन वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलचा वक्तशीरपणा ढासळला आहे. याचा थेट फटका चाकरमान्यांना बसून दररोजच्या लेटमार्कमुळे अनेकांवर नोकरी टिकविण्याचे संकट ओढवले आहे. लोकल रखडल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप असतो आणि लोकल स्थानकात येताच प्रवाशांच्या रोषाचा पहिला सामना करावा लागतो तो मोटरमनला !
मध्य रेल्वेचे ४५ लाख आणि पश्चिम रेल्वेचे ४० लाख अशा सुमारे ८५ लाख प्रवाशांच्या संतापाचा स्फोट झेलणे आणि विलंबाची भरपाई करण्यासाठी लोकलचा वेग वाढविताना सिग्नल तुटल्यास रेल्वे प्रशासनाच्या कठोर कारवाईला सामोरे जाणे; अशा दुहेरी कात्रीत रोज १,२६८ मोटरमन प्रचंड मानसिक तणावाखाली नोकरी करत आहेत. पण ही शोकांतिका त्यांना कोणाकडेही मांडता येत नाही.
मोटरमनना सव्वा ते दोन लाख रुपयांच्या घरात पगार असला, तरी या सुबत्तेच्या पडद्यामागील वास्तव अतिशय भीषण आहे. धावत्या लोकलमध्ये सेकंदा-सेकंदाचा निर्णय महत्त्वाचा असतो. वेग सुधारण्यात सिग्नल तोडला गेला, तर अनेक वर्षांची पगारवाढ थेट डाऊन करण्याची कडक शिक्षा केली जाते. परिणामी, हातात अर्धाच पगार येतो. गृहकर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण व रोजचा खर्च भागवताना नाकी नऊ येतात.
मोटरमनच्या कामाचे तास कागदावर ८ असले, तरी लोकल विलंबाचा फटका ड्युटीलाही बसतो. लोकल सुरू झाली की, ती शेवटच्या स्थानकावर पोहोचवल्याशिवाय त्यांची ड्युटी संपत नाही. पावसाळ्यात तांत्रिक व इतर अडचणींमुळे लोकल प्रवासात मध्येच कितीही वेळ रखडली, तरी त्यांना ड्युटी पूर्ण करावीच लागते. आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी लोकलमधून उतरून हव्या त्या ठिकाणी निघून जाऊ शकतो, पण मोटरमनला गाडी सोडता येत नाही. कित्येक तास एकाच जागी उभे राहणे आणि शौचास जाण्याचीही सोय नसल्याने बहुतांश मोटरमन मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, मेंदूचे विकार आणि पायांच्या नसा फुगणे अशा गंभीर शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत.
३६५ दिवस कोणत्याही वेळेची अहोरात्र ड्युटी, सुट्ट्यांचा अभाव आणि कौटुंबिक आयुष्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मोटरमन कमालीचे मानसिक खचलेले असतात. मोटरकॅबमध्ये ते पूर्णपणे एकटे असतात. मिनिटा-मिनिटाला बदलणारे सिग्नल सतत पाहावे लागत असल्याने डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. वय वाढेल तसा डोळ्यांचा कोरडेपणा आणि एकाच वस्तू दोन-दोन दिसणे, असे नेत्रविकार त्यांना जडतात. प्रवासादरम्यान रुळ ओलांडताना एखादा प्रवासी अचानक समोर येऊन अपघात झाला, तर त्या अंगावर काटा आणणाऱ्या दृश्यानंतरही खचून न जाता हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना धीरोदात्तपणे लोकल पुढे न्यावीच लागते. मनुष्याच्या शरीराचे झालेले तुकडे, उडालेले रक्त व तो आक्रोश मनात घर करतो. या अपघातांच्या आठवणींमुळे अनेक मोटरमनना रात्रीची झोप येत नाही.