११ बळी गेल्यानंतरही कल्याणहून मुरबाडला अवैध प्रवासी वाहतूक सुरूच, शेअर टॅक्सीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:37 IST2026-04-15T13:37:08+5:302026-04-15T13:37:53+5:30
Kalyan Accident News: अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सोमवारी रायता पुलावरील अपघातात ११ जणांचा बळी गेला. त्यानंतरही या भागात शेअर टॅक्सीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून अवैध प्रवास सुरूच असल्याचे चित्र मंगळवारी दिसले.

११ बळी गेल्यानंतरही कल्याणहून मुरबाडला अवैध प्रवासी वाहतूक सुरूच, शेअर टॅक्सीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
- राजेश जाधव
म्हारळ - अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सोमवारी रायता पुलावरील अपघातात ११ जणांचा बळी गेला. त्यानंतरही या भागात शेअर टॅक्सीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून अवैध प्रवास सुरूच असल्याचे चित्र मंगळवारी दिसले. इको व्हॅनमध्ये सहा प्रवाशांची परवानगी असताना शहाडजवळील बिर्लागेट थांब्यावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात होते.
कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळ नाक्यावर वाहतूक पोलिसांचे पथक रोज उभे असते. मात्र, त्यांची नजर बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जात नाही का? अवैध प्रवासी वाहतूकदारांवर काय कारवाई होते, असा सवाल उपस्थित होत आहे. अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही चालकांवर परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. अपघातास दोन्ही चालक जबाबदार आहेत की, अन्य आणखी कारणे आहेत याविषयी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम तपास करत आहेत.
तीन वळणे धोकादायक
कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून आता तो महामार्ग क्रमांक ६६ म्हणून ओळखला जातो. या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तसेच नव्याने बांधलेल्या पुलाचे कामही पूर्ण होत आले आहे.
गोवेली पुढच्या ढाब्याजवळचे वळण, रेवती-बापसई आणि मामनोली गावापुढील पोटगावच्या जंगलातील वळण मात्र जसेच्या तसे आहे. ही तीनही मोठी वळणे अपघाताला निमंत्रण देणारी ठरतात, याकडे येथील ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे.
ट्रकचा चालकास अटक
सोमवारी एकाच दिवसात या मार्गावर रायता, पोटगाव आणि मडके पाडा येथे तीन अपघात झाले. तर रायता पुलावरील अपघात स्थळावरून पळून गेलेला सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा चालक कमलेश यादव (रा. उत्तर प्रदेश) यास मंगळवारी टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
कल्याण पश्चिमेकडून मुरबाडसाठी रिक्षा सुरू
कल्याण : सोमवारच्या अपघातानंतर कल्याण पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील शेअर टॅक्सी स्टॅण्ड ओस पडला होता. सोमवारी अपघातानंतर टॅक्सी स्टॅण्डवरील चालकांनी वाहने येथून हटवली होती. मंगळवारी देखील हा स्टॅण्ड पूर्णपणे रिकामा होता. टॅक्सी बंद झाल्या असल्या तरी काही रिक्षाचालक मुरबाडला जाण्यासाठी प्रवाशांकडून शंभर ते दीडशे रुपये आकारत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
अपघातग्रस्त मार्गिकेवर डिव्हायडरचा पांढरा पट्टा नाही
कल्याण-मुरबाड महामार्गावरील रायता पुलावरील अपघातग्रस्त मार्गिकेवर डिव्हायडरचा पांढरा पट्टा मारलेला नसल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर आढळले.