Zilla Parishad Election 2026 : भाजपसोबत जमलं नाही तर वेगळा विचार; शिंदे गटाचील नेत्याचा सूचक इशारा
By संतोष कनमुसे | Updated: January 20, 2026 13:57 IST2026-01-20T13:49:39+5:302026-01-20T13:57:02+5:30
शहाजी पाटील म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षांबरोबर चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी भाजपसोबत चर्चा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Zilla Parishad Election 2026 : भाजपसोबत जमलं नाही तर वेगळा विचार; शिंदे गटाचील नेत्याचा सूचक इशारा
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जागावाटपांबाबत बैठकांना वेग आला असून महायुती एकत्र निवडणुका लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिंदेसेनेचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठे विधान केले आहे. 'भाजपसोबत चर्चा सुरू असल्या तरी, जर समन्वय साधता आला नाही तर वेगळा विचार करण्याचाही पर्याय खुला असल्याचा सूचक इशारा शहाजी पाटील यांनी दिला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
शहाजी पाटील म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षांबरोबर चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी भाजपसोबत चर्चा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, राजकीय परिस्थिती आणि स्थानिक समीकरणांचा विचार करता, जर भाजपसोबत जुळवून घेता आलं नाही तर पर्यायी मार्गाचा विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगोल्यात मात्र भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आयकर विभागाच्या धाडींबाबत बोलताना शहाजी पाटील यांनी या कारवाया निवडणुकीचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. या धाडी यंत्रणात्मक असून, संबंधित विभागांचे हे नियमित काम आहे. सर्वच पक्षांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होतो का, याची तपासणी केली जाते. आपल्या कार्यालयातही तपासणी झाली होती आणि अधिकारी तपासणी करून निघून गेले, असे त्यांनी सांगितले. केवळ आपलेच नव्हे, तर सर्वांचीच कार्यालये तपासण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
एबी फॉर्म वाटपाच्या वादावर पाटील म्हणाले, एका गटात अनेक इच्छुक उमेदवार असतात, मात्र तिकीट एकालाच मिळते, त्यामुळे असंतोष निर्माण होतो आणि हे सर्वत्र सुरू असते.
ठाकरेंनी मनसेलाही संपवले
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याबरोबरच, आता मनसेलाही एका निवडणुकीत संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
सांगोला जिल्हा परिषद निवडणुकीबाबत पाटील म्हणाले, ही निवडणूक सर्व पक्ष एकत्र लढवतील, मात्र शेकाप आमच्यासोबत नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईत महापौर महायुतीचाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.