त्या अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू, पोलीस दत्ता देसार्इंच्या प्रयत्नांना अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 03:39 PM2020-04-02T15:39:25+5:302020-04-02T15:49:33+5:30
येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला अत्यवस्थ स्थितीत गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी तिचे निधन झाले.
सावंतवाडी : खाकी वर्दी म्हटली की समाजात सर्वत्र तिरस्कार केला जातो. पण खाकी वर्दीतील सर्वच माणसे वाईट नसतात. त्यांच्यात माणुसकीचा झरा असतोच. असेच काहीसे चित्र सावंतवाडीत पहायला मिळाले. शनिवारी ज्युस्तीनगर येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला अत्यवस्थ स्थितीत गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी तिचे निधन झाले.
सावंतवाडीतील मोती तलावात शनिवारी जिजा तुकाराम ब्राम्हणेकर (रा. ज्युस्तीनगर, सावंतवाडी) या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वांसमोरच या महिलेने तलावात उडी मारली. हे अनेकांनी पाहिले. त्यानंतर आरडाओरड झाली. सध्या संचारबंदी असल्याने सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोती तलावाच्या काठी वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी असतात.
एका महिलेने तलावात उडी मारली याची माहिती वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट मोती तलावात उडी मारली. महिला पाण्यात आत जाणार असे वाटत असतानाच देसाई यांनी त्या महिलेला पाण्याच्या वर आणले.
नंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनीही त्या महिलेला आधार देत वर घेतले. ती महिला बेशुध्द होती. तिला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथे तिच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले पण ती बेशुध्द असल्याने तसेच तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. मात्र, सायंकाळी या महिलेचे निधन झाल्यामुळे सर्वांनीच केलेले प्रयत्न शेवटी अपयशी ठरले.
खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन मोती तलावाच्या काठावर देसार्इंसारखे पोलीस नसते तर त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. पाच वर्षांपूर्वीही दत्ता देसाई हे सावंतवाडीत कार्यरत होते.
त्यावेळी देसाई यांनी तलावात पडणाऱ्या तसेच पडलेल्या अनेकांना वाचविले आहे. सावंतवाडीची वाहतूक व्यवस्था म्हणजे देसाई असे एक समीकरण झाले होते. देसाई यांची बदली झाली तर त्यांना पुन्हा सावंतवाडीत आणा, अशी अनेकांनी मागणी ही केली होती.
मात्र, पाच वर्षांनी देसाई हे पुन्हा सावंतवाडीत आले आहे. आणि वाहतूक पोलीस असताना शनिवारी एका महिलेचा पुन्हा एकदा प्राण वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही.त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा समाजासमोर आल्याचे दिसून येत आहे.