प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST2021-03-07T04:36:23+5:302021-03-07T04:36:23+5:30

औंध : औंध येथील केदारेश्वरनजीकचा लोकवस्तीतील बंधारा निर्लेखित करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे ...

The strike was called off after written assurances from the administration | प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

औंध : औंध येथील केदारेश्वरनजीकचा लोकवस्तीतील बंधारा निर्लेखित करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.

औंध (ता. खटाव) येथील सिमेंट बंधाऱ्यात दूषित पाणी राहणार नाही, याबाबत कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांनी चार दिवसांत कार्यवाही करावी व बंधारा अतितत्काळ निर्लेखित करण्यासाठी सोमवारी प्रस्ताव सादर करावा, असे लेखी पत्र प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी दिल्यानंतर उपोषणकर्ते सागर जगदाळे यांनी सहाव्यादिवशी उपोषण मागे घेतले.

प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे, डॉ. विलास साळुंखे, ग्रामविकास अधिकारी चाँदशा काझी, मंडल अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बंधारा परिसराची पाहणी केली आणि सागर जगदाळे यांच्याबरोबर चर्चा केली. यामध्ये कृषी विभागाने आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्यविषयक अहवाल तसेच स्थळ फोटो घेऊन बंधारा निर्लेखित करण्यासाठी तत्काळ वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करावा. तसेच बंधाऱ्यातील दूषित पाणी भौगोलिक परिस्थितीमुळे उपाययोजना करता येत नाहीत. बंधारा नागरी वस्तीत असल्याने लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी बंधारा निर्लेखित करावा, असा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा, असे प्रशासनाच्यावतीने लेखी स्वरुपात पत्र दिले. यावर सागर जगदाळे यांचे समाधान झाल्याने उपविभागीय अधिकारी कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.

यावेळी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, दत्तात्रय जगदाळे, राजेंद्र माने, वसंत पवार, तानाजी इंगळे, गणेश चव्हाण, संदीप इंगळे, कृषी सहायक उत्तमराव तिकुटे, मोहन मदने, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

कोट..

औंध येथील केदारेश्वरनजीकच्या बंधाऱ्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते. प्रशासनाला निवेदन देऊनही काही फरक पडला नसल्याने लोकशाहीच्या मार्गाने उपोषण केले व सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे.

- सागर जगदाळे, उपोषणकर्ते, औंध

(चौकट)

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची मध्यस्थी

माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाशी फोनवरून चर्चा करून बंधाऱ्याविषयी गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासन आणि उपोषणकर्ते सागर जगदाळे यांची सकारात्मक चर्चा झाली.

०६औंध

फोटो : - प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन सागर जगदाळे यांनी उपोषण सोडले. (छाया - रशिद शेख)

Web Title: The strike was called off after written assurances from the administration