Maharashtra Election 2019 :सांगली जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत ४९.३१ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 04:08 PM2019-10-21T16:08:38+5:302019-10-21T16:27:39+5:30

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४९.३१ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.

In Sangli district, by 9 pm, the voter turnout was 19.5 percent | Maharashtra Election 2019 :सांगली जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत ४९.३१ टक्के मतदान

Maharashtra Election 2019 :सांगली जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत ४९.३१ टक्के मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत ४९.३१ टक्के मतदानमतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना

सांगली : सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४९.३१ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.

रेठरे धरण येथील गावाच्या मध्यभागी गणपती मंदिराजवळ असणाऱ्या बुथ क्रमांक १४३ वर दुपारी पावणे तीन वाजता मतदान संथ गतीने सुरु होते,त्यावेळी सुमारे दोनशेच्यावर महिलांनी रांग लावली होती.
दुपारी ३ वाजेपर्यंत जत विधानसभेसाठी ४५.५0, शिराळा मतदार संघात ५७.५७, इस्लामपूर मतदारसंघात ५६.0४, पलूस-कडेगाव मतदारसंघात ५६.१४, खानापूर-आटपाडी मतदारसंघात ४७.१0, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रात ५५.३९, मिरज विधानसभा क्षेत्रात ३८.१0, तर सांगली विधानसभा क्षेत्रात ४१.२४ टक्के मतदान झाले.
सांगली मतदार संघात सांगलीवाडी व गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याने अर्धा तास नागरिकांना मतदानासाठी ताटकळत थांबावे लागले. वाळवा मतदारसंघातील साखराळे व तासगाव-कवठेमहांळमधील आरवडे येथे, तसेच शिराळा तालुक्यातही काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले.

या नेत्यांनी केले मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी साखराळे येथे सहकुटुंब मतदान केले. तर प्रा एन डी पाटील आणि सरोज पाटील यांनी ढवळी (ता.वाळवा) येथे ११ वाजता मतदानाचा हक्क बजवला. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार सुधीर गाडगीळ सहकुटुंब रांगेत उभे होते, त्यांनी पत्नी मंजिरी गाडगीळ, मुलगा सिद्धार्थ गाडगीळ, सून हिमगौरी गाडगीळ यांच्यासह मतदानाचा हक्क बजवला. अजितराव घोरपडे यांनी आपल्या कोगनोळी गावी मतदानाचा हक्क बजावला तर माजी आमदार सदाशिराव पाटील यांच्यासह कुटुंबियांनी विटा येथे मतदानाचा हक्क बजावला. रोहित पाटील यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. शिवाजीराव नाईक यांनी चिखली येथे मतदान केले. पलुस कडेगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय विभूते यांनी नेवरी येथे मतदानाचा हक्क बजावला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहलताई पाटील व तासगाव माजी बाजार समिती अध्यक्ष अनिल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला, सकाळी जत शहर,प्रभाग क्रमांक १० येथे आमदार विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांसमवेत मतदान केले. भाजपाचे नेते सत्यजित देशमुख यांनी कोकरूड, चिंचोली येथे युवक व जेष्ठ कार्यकर्त्यांच्या सोबत मतदान केले.

पेठ, ता वाळवा येथे महाडिक कुटूंबातील सदस्यांनी मतदान केले. येलुर येथे वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल दादा महाडीक व हर्षदा राहुल महाडीक यांनी मतदानाचा हक्क बजावला. शिराळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक आणि पेठ गावच्या सरपंच मीनाक्षी महाडिक यांनी मतदान केले. खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांनी गार्डी (ता.खानापूर) येथे मतदानाचा हक्क बजावला.
वाळवा येथील हुतात्मा चौक येथील मतदान केंद्र क्रमांक १३७ येथे गौरव नायकवडी यांनी सकाळी आठ वाजता मतदान केले. स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांनी पत्नी रेणुका, मुलगी ऋतुजा, मुलगा ऋषीकेश यांच्यासमवेत शिवाणनुभव मंडप येथील प्रभाग क्रमांक ३ येथे मतदान केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कडेपुर येथे मतदानाचा हक्क बजावला. कडेपूर येथे म्आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. सोनसळ येथे आमदार विश्वजीत कदम यांनी परिवारासोबत मतदानाचा हक्क बजावला.


ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगही नव्हते मागे

मतदान प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींही मागे नव्हत्या. समडोळी येथे दिव्यांग मतदारांचे स्वागत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत यांनी केले, इस्लामपूर शहरातील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत शिंदे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिव्यांग मतदारांना स्वत:च्या वाहनातून मतदान केंद्रापर्यंत नेवून मतदान प्रक्रियेसाठी मदत केली.
खानापूर तालुक्यातील गोरेवाडी येथे १0१ वय असणाºया दिव्यांग वृद्धेने मतदान केले. कुंडल येथे ८0 वय असलेल्या हरीभाऊ जनाप्पा पाटोळे या दिव्यांग मतदाराने मतदान केले. जत तालुक्यातील वाळेखिंडी मतदान केंद्रावर ८५ वर्षाच्या मुक्ताबाई पांडुरंग काशीद यांनी मताचा अधिकार बजावला. शिवणी (तालुका कडेगाव) येथील मतदान केंद्रात दिव्यांग असलेले बंधू वैभव पवार व दिग्विजय पवार यांनी मतदान केले.

धोंडीराम कोळी या वृद्धाने सायकलवरून येऊन मतदान केले. शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील मतदान केंद्रावर आजारी आईला उचलून घेऊन मतदान करण्यास त्यांच्या मुलाने मदत केली. बोरगाव येथील अक्काताई गोविंद यादव यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. स्वातंत्र्यसैनिक इंदुबाई दत्तात्रय लोहार व ज्येष्ठ नागरिक आण्णा परीट यांनी मतदान केले. 

सांगलीतील अंगणवाडी केंद्र क्रमांक १६५ आणि आमणापूर येथील आदर्श पाळणाघरात म्हणून मतदाराच्या बालकांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. सांगलीत सकाळी मतदान सुरु झाले तेव्हा मात्र, गवळी गल्ली, गावभागात बुथवरील कार्यकर्ते मतदारांच्या प्रतिक्षेत होते. सुरुवातीला मतदारांची तुरळक गर्दी होती. नंतर मात्र वेग वाढला. सांगलीवाडीत दोन केंद्रांवर सकाळी सातपासूनच रांगा होत्या. महिलांनी गटागटाने मतदान केले. म्हैसाळ येथील २७४ या बुथवर मतदानासाठी महिलानी मोठी गर्दी केली होती.

मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना

बोरगाव ता वाळवा येथे मतदान केंद्र क्रमांक २८३ मधील बूथ क्रमांक ५७ वर तब्बल १ तास १0 मिनिटे मशिन बंद होते ते दुरूस्त होई पर्यंत मतदान केंद्रावर मतदार बसून होते. जेवढा वेळ मशिन बंद होते, तेवढा वेळ मतदान करण्यास अधिकाऱ्यांनी वेळ द्यावा अशी मागणी सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींनी केली आहे. सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये इव्हीएम यंत्र काही मिनिटांसाठी बंद पडल्याने तेथेही मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. आरवडे ता.तासगाव मध्ये बूथ क्रमांक २६ मध्ये मतदान यंत्र बंद पडले. शिराळा तालुक्यातील बिळाशी तालुका शिराळा येथेही मतदान केंद्र क्रमांक १९८ येथे हे मशीन अर्धा तास बंद पडले होते, त्यानंतर ते व्यवस्थित सुरु झाले. गणेशनगर जलतरण तलाव केद्र क्रमांक २१९ येथे मशिन बंद झाल्याने मतदार ताटकळत रहावे लागले, अखेर हे यंत्र बदलण्यात आले.

पावसानेही मतदारांना फटका दिला. सांगलीवाडीत लक्ष्मीबाई पाटील विद्यालयात पावसाने तळे साचले होते. मतदार पाण्यातूनच मतदानासाठी जात होते. खंडनाळ ता. जत येथील बहुतेक ग्रामस्थांनी पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आतापर्यंत या गावातील दोन मतदान केंद्रावर १६१० पैकी १६ इतकेच मतदान झाले आहे.
वाळवा येथील हुतात्मा चौक या १३२ आणि कोटभाग येथील १३७ या मतदान केंद्रावर मतदानासाठी महिला व पुरुष यांच्या रांगा लागल्या होत्या. रेठरे धरण ता वाळवा येथील बूथ क्रमांक १४१ वर दुपारी १२.३० वाजता ४० टक्के मतदान मतदान झाले होते. यावेळी महिलांची गर्दी लक्षणीय होती. बिळाशी तालुका शिराळा येथे सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. आमणापूर येथे महिला मतदारांमध्ये उत्साह होता. पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान कक्षाबाहेर मोबाईल काढून ठेवण्यात येत होते.


क्रांतीविरांगना हौसाताई पाटील यांनीही केले मतदान

कडेगाव तालुक्यातील हणमंतवडिये येथील ९४ वर्षाच्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांनी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासुन ते आजपर्यंतच्या सर्व निवडणुकीतील मतदानात त्या आवर्जुन सहभाग घेत आहेत.

 

Web Title: In Sangli district, by 9 pm, the voter turnout was 19.5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.