पाऊस, वादळामुळे बत्ती गुल; रत्नागिरीकरांना रात्र काढावी लागली अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:56 IST2026-05-11T12:56:18+5:302026-05-11T12:56:53+5:30
महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे १०८ पोल, लघुदाब वाहिनीचे २३५ खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.

पाऊस, वादळामुळे बत्ती गुल; रत्नागिरीकरांना रात्र काढावी लागली अंधारात
रत्नागिरी : पंधरा मिनिटे झालेले वादळ आणि त्यानंतर पाऊणतास पडलेला मुसळधार पाऊस यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक फटका महावितरणला बसला. जिल्ह्यातील नऊ उपकेंद्रे ठप्प झाल्यामुळे त्यातील एक लाख ११ हजार ४८५ ग्राहकांना शनिवारची रात्र अंधारात काढावी लागली.
वादळवारे आणि पावसामुळे रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील वीज यंत्रणा विस्कळीत झाली. जिल्ह्यात महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे १०८ पोल, लघुदाब वाहिनीचे २३५ खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
पाऊस थांबताच महावितरणची यंत्रणा कामाला लागली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अखंडितपणे काम सुरू होते. रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास ८५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र, २६ हजार ३२५ ग्राहक रविवारी सायंकाळीही अंधारातच होते.