Ratnagiri Crime: रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडलेल्या सुधीर अर्जुन यादव (३०) तरुणाच्या मृत्यूचे कारण उलगडण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे. हा अपघात नसून दारूच्या कारणावरून मित्राने त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आशिष शांताराम भावके (२७), आशिष शांताराम भावके (२७) यांना अटक करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुधीर अर्जुन यादव आणि आशिष शांताराम भावके हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र होते. हे दोघेही रत्नागिरीतील आरेवारे येथे पर्यटनासाठी आले होते. तिथे त्यांनी मद्यपान आणि जेवण केले. परतीच्या प्रवासाला निघाले असताना ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ११:३०च्या सुमारास महामार्गावरील मौजे दख्खन गावच्या हद्दीत दोघांमध्ये दारूवरून वाद झाला.
सुधीर याने आणखी दारू पाहिजे, या हट्टापायी आशिषच्या कारच्या बोनेटवर बसून काच फोडली. याचा राग आल्याने आशिष याने सुधीर बोनेटवर बसलेला असतानाच गाडी चालवली, ज्यामुळे सुधीर खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्यानंतर, त्याला त्याच अवस्थेत सोडून तिथून पळ काढला होता.
सुरुवातीला आशिष याने सुधीर गाडीतून पडल्यामुळे जखमी झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र, देवरुख पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता, आशिष याने सुधीर याला जाणीवपूर्वक मृत्यूच्या खाईत ढकलल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ दिवसांची पोलिस कोठडी
सुरुवातीला मित्र गाडीतून उतरला आणि पडला, अशी माहिती आशिष भावके यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सुधीर यादव याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी आशिष याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Summary : Sudhir Yadav's death in Amba Ghat was murder, not an accident. Ashish Bhavke killed him after an alcohol-related argument during a trip. Enraged, Ashish drove the car while Sudhir was on the hood, causing fatal injuries. Ashish initially misled police, but was arrested and faces culpable homicide charges.
Web Summary : अम्बा घाट में सुधीर यादव की मौत दुर्घटना नहीं, हत्या थी। आशीष भावके ने शराब विवाद में उसकी हत्या कर दी। गुस्से में आकर आशीष ने सुधीर को बोनट पर बैठाकर गाड़ी चलाई जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। आशीष ने शुरू में पुलिस को गुमराह किया, लेकिन गिरफ्तार कर लिया गया।