९६ गावांत पाणी पातळी घटली

By Admin | Updated: April 20, 2017 03:43 IST2017-04-20T03:43:15+5:302017-04-20T03:43:15+5:30

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वाढलेले तापमान, जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ९६ गावांतील भूजल पातळीत झालेली विक्रमी घट आणि पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील

9 6 water level decreases in the villages | ९६ गावांत पाणी पातळी घटली

९६ गावांत पाणी पातळी घटली

जयंत धुळप, अलिबाग
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वाढलेले तापमान, जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ९६ गावांतील भूजल पातळीत झालेली विक्रमी घट आणि पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणे व जलाशय प्रकल्पात १५ एप्रिलअखेर शिल्लक राहिलेला सरासरी ३३.२८ टक्के उपयुक्त जलसाठा आणि जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १२ तालुक्यांत निष्पन्न दूषित जलनमुने या पार्श्वभूमीवर यंदाच्या उन्हाळ््यातील तीव्र जलदुर्भिक्ष आणि गंभीर पाणीटंचाई आता दृष्टिक्षेपात आली असून त्याचा मुकाबला करण्याकरिता जिल्हा प्रशासनास विशेष नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ९६ गावांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा नैसर्गिक भूजल पातळीत घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३४ गावे महाड तालुक्यातील आहेत, तर उर्वरित पोलादपूर तालुक्यात २४, खालापूर तालुक्यात १८, तळा तालुक्यात १५, माणगाव तालुक्यात ३ तर कर्जत तालुक्यात दोन गावे आहेत. सप्टेंबर २०१६ अखेर संपलेल्या गतवर्षीच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात सरासरी अपेक्षित ३ हजार ३५० मिमी पर्जन्यमानापैकी ६.३४ टक्के कमी म्हणजे ३ हजार १३७ मिमी पाऊस झाल्याने या तालुक्यात पाणीटंचाईची झळ तीव्रतेने जाणवत आहे.
गतवर्षीच्या मान्सूनमध्ये खालापूर तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित १४ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या धरणे आणि जलाशयांनी यंदाच्या तीव्र उन्हामुळे १५ एप्रिल रोजीच तळ गाठण्यास प्रारंभ केला आहे. लघु पाटबंधारे विभागाची जिल्ह्यात २८ धरणे व जलाशय असून, त्यामध्ये सद्यस्थितीत सरासरी ३३.२८ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये ३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. रायगड पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या या २८ धरणे व जलाशयांतील पाणी ८० गावांना पिण्यासाठी तर ४ हजार ६४८ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाकरिता वापरण्यात येते.
मुरुड, तळा, रोहा, पेण, अलिबाग, सुधागड, खालापूर या तालुक्यातील धरणांमधील उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. यामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एप्रिलमध्येच पाण्याची अशी स्थिती असेल तर मे महिन्यात पाणी प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यातील १२ तालुक्यांत दूषित पाणी निष्पन्न
एकीकडे पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष असतानाच उपलब्ध पाण्यापैकी जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील पाणी नमुने जलतपासणीत दूषित निष्पन्न झाल्याने, दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था जिल्ह्यातील काही गावांमध्ये झाली आहे.
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अशा दोन यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ तालुक्यातील एकू ण ५२ प्राथमिक आरोग्य क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीकरिता घेण्यात येतात. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकूण १३२४ जलनमुन्यांपैकी १३.१४ टक्के म्हणजे १७४ जलनमुने दूषित निष्पन्न झाले आहेत.

Web Title: 9 6 water level decreases in the villages