Maharashtra Rain: ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा जिल्ह्याला 'यलो अलर्ट', पुण्याला ‘ऑरेंज अलर्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:47 IST2025-06-20T10:46:59+5:302025-06-20T10:47:15+5:30
पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

Maharashtra Rain: ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा जिल्ह्याला 'यलो अलर्ट', पुण्याला ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे: नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, बिहार व पूर्व उत्तर प्रदेशमधील आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे. दोन ते तीन दिवसांत मान्सून उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशाचा उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू- काश्मीरमध्ये आगेकूच करण्यास अनुकूल परिस्थिती आहे.
उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर द्रोणिका रेषा स्थिर आहे. पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून गुरुवारी (दि. २०) ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा घाट परिसर, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, तर पुण्याच्या घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यांनतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे.
राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची चिन्ह आहेत. हवामान विभागाकडून मुंबई, रत्नागिरी, रायगड भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला २० ते २२ जूनपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता असून नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे.