उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पुणे, साताऱ्यात पाणीटंचाई, दोन्हीकडे साडेसात हजारांहून अधिक नागरिक तहानलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:31 IST2026-03-31T18:31:19+5:302026-03-31T18:31:31+5:30

धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात शिल्लक असला, तरी जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे

Water shortage in Pune and Satara at the beginning of summer, more than 7,500 citizens in both are thirsty | उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पुणे, साताऱ्यात पाणीटंचाई, दोन्हीकडे साडेसात हजारांहून अधिक नागरिक तहानलेले

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पुणे, साताऱ्यात पाणीटंचाई, दोन्हीकडे साडेसात हजारांहून अधिक नागरिक तहानलेले

पुणे: गेल्या पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा खोऱ्यांतील सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्हे वगळता पुणे आणि सातारा जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत १६ तालुक्यांमधील साडेसात हजारांहून अधिक नागरिक तहानलेले आहेत. यासाठी प्रशासनाकडून तातडीने खासगी, सरकारी १३ विंधन विहिरी आरक्षित करून १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवते, अशा तालुक्यांतील वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

गेल्या वर्षी मोसमी पाऊस विलंबाने सुरू झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली होती. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाच्या धारा कोसळत होत्या. त्यामुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यांतील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून तीव्र उन्हाळा आणि झळा बसण्यास सुरुवात झाली. सर्वाधिक टंचाई सातारा जिल्ह्यात बसत असून, या ठिकाणच्या माण, वाई, पाटण, खंडाळा, कराड या ठिकाणी जाणवत आहे; तर पुण्यातील आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दोन गावे आणि १९ वाड्यांवर ३ हजार २५१, वाई तालुक्यातील ४ गावे, ३ वाड्यांवरील ३ हजार ६५९ आणि पाटण तालुक्यातील २ वाड्यांवर ५९२ नागरिक पाणीटंचाईमुळे बाधित झाले आहेत. नागरिकांबरोबर पशुधनालाही पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, वाई आणि पाटण तालुक्यांतील अनुक्रमे १ हजार ४९५ आणि २९५ असे एकूण १ हजार ७९० पशुधन बाधित असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून दिली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार महिने उन्हाच्या तीव्र झळा वाढणार आहे. धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात शिल्लक असला, तरी जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन केले असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या तालुका, गाव, वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी विहीर, विंधन विहीर ताब्यात घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त स्तरावर केले आहे.

विभागनिहाय आढावा

तालुका - बाधित लोकसंख्या - टँकर

आंबेगाव - ० - ९

माण - ३२५१ - २

वाई - ३६५९ - ३

पाटण - ५९२ - २

एकूण - ७५०२ - १६

Web Title : गर्मी शुरू होते ही पुणे, सतारा में पानी की किल्लत: हजारों प्रभावित

Web Summary : पश्चिमी महाराष्ट्र में पर्याप्त बांध भंडारण के बावजूद पुणे और सतारा जिले पानी की कमी से जूझ रहे हैं। 16 तालुकों में 7,500 से अधिक निवासी प्रभावित हैं। अधिकारी टैंकरों के माध्यम से पानी की आपूर्ति कर रहे हैं और संकट को दूर करने के लिए निजी कुओं को आरक्षित कर रहे हैं।

Web Title : Pune, Satara Face Water Scarcity at Summer's Onset: Thousands Affected

Web Summary : Pune and Satara districts grapple with water scarcity despite adequate dam storage in western Maharashtra. Over 7,500 residents across 16 talukas are affected. Authorities are supplying water via tankers and reserving private wells to address the crisis.