'अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार', खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचे काम वेगाने सुरू, १ किलोमीटर काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:32 IST2026-02-12T10:32:20+5:302026-02-12T10:32:33+5:30
खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे

'अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार', खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचे काम वेगाने सुरू, १ किलोमीटर काम पूर्ण
पुणे : खडकवासला धरणाच्या कालव्यातील पाण्याची गळती, चोरी, जलप्रदूषण व बाष्पीभवन रोखण्यासाठी खडकवासला धरण ते फुरसुंगी यादरम्यान बोगद्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची अशा चार ठिकाणी एकाच वेळी चार टनेल बेअरिंग मशीनच्या माध्यमातून (बुमर) बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे एक किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. एका बुमरच्या माध्यमातून दिवसामध्ये आठ मीटर बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. आणखी तीन ठिकाणांहून लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने १६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीची निविदा काढली होती. त्यानुसार या बोगद्याचे काम ‘मेघा इंजिनिअर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. तर अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडून मान्यता मिळाल्याने जागेवर कामाला सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली असून आतापर्यंत एक किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत तीन वर्षांची असणार आहे.
बुमर मशीनच्या साहाय्याने ६.३ डायमीटर ‘डी’ आकाराचा बोगदा खोदण्यात येत आहे. काम गतीने होण्यासाठी एकाच वेळी चार ठिकाणांहून बोगदा खोदण्यात येत आहे. लवकरच कात्रज, वडकी आणि लोणी काळभोर येथूनही बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर त्यातून प्रतिसेकंद ४१ क्युसेक (क्युबिक मीटर) पाणी सोडण्यात येणार आहे. तर धरणाच्या भिंतीपासून मागील बाजूस ९० मीटर अंतरावर आणि जलाशयाच्या खालील बाजूस १८ मीटर खोलीवरून हा बोगदा जाणार आहे. त्यामुळे पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. परिणामी पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होणार आहे.