महापौर बंगला परिसरातील झाडांची कत्तल; ज्यांच्याकडे झाडे जगवण्याची जबाबदारी त्यांनीच केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:48 IST2026-04-25T15:48:14+5:302026-04-25T15:48:26+5:30
शहरातील धोकादायक झाडे व धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीवर असते

महापौर बंगला परिसरातील झाडांची कत्तल; ज्यांच्याकडे झाडे जगवण्याची जबाबदारी त्यांनीच केली कारवाई
पुणे: शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावर असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारातील तब्बल १९ झाडांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली झाडांचीच कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या वृक्ष संवर्धन समितीवर झाडे जगवण्याची जबाबदारी आहे, त्या समितीने झाडांची कत्तल केल्याचे समोर आले आहे.
शहरातील धोकादायक झाडे व धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीवर असते. यासाठी संबंधित नागरिकास त्या झाडाचा किंवा फांद्यांचा फोटो महापालिकेकडे अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर समितीकडून परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाचे हॉर्टिकल्चर मिस्त्री रवींद्र कांबळे यांनी दि. १२ मार्चला घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या १९ वृक्षांच्या फांद्या छाटणीचा प्रस्ताव शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला होता. त्यावर सहायक आयुक्तांनी लगेचच तत्परता दाखवून दि. १३ मार्चला हा प्रस्ताव मंजूर करून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले, त्यानुसार वृक्ष संवर्धन विभागाने दोन दिवसांपूर्वी फांद्या छाटणीच्या नावाखाली १९ वृक्षांची अक्षरशः कतल करण्याचे काम केले आहे. त्यासाठी महापौर बंगल्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी या वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे कारण देण्यात आले आहे.
यासंदर्भात वृक्षप्रेमी समीर निकम यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात जागतिक वसुंधरा दिनाच्या दिवशीच शहराच्या प्रथम नागरिकांच्या बंगल्यातील वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.