Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा 'जाम'! ३२ तासांनंतर टँकर हटला, पण कंटेनर बंद पडल्याने पुन्हा वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:00 IST2026-02-05T09:51:45+5:302026-02-05T10:00:21+5:30
Mumbai Pune Expressway Traffic Update: लोणावळ्यात सिमेंट कंटेनर बंद पडल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी वाढली आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा 'जाम'! ३२ तासांनंतर टँकर हटला, पण कंटेनर बंद पडल्याने पुन्हा वाहनांच्या रांगा
Mumbai Pune Expressway Traffic Update:मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या ३२ तासांपासून सुरू असलेला वाहतूक कोंडीचा त्रास अद्याप संपलेला नाही. आडोशी बोगद्याजवळील गॅस टँकरचा अपघात आणि आता लोणावळ्याजवळ बंद पडलेला सिमेंट कंटेनर यामुळे हा मार्ग पुन्हा ठप्प झाला आहे. लोणावळ्या अलीकडे २० किमीपासून वाहनांच्या संथ रांगा पाहायला मिळत आहेत.
गॅस टँकरनंतर आता सिमेंट कंटेनर
आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने सुरक्षा कारणास्तव वाहतूक बराच वेळ थांबवण्यात आली होती. तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा टँकर बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, ही कोंडी फुटेत न फुटते तोच तळेगाव ते मळवली दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारा एक सिमेंट कंटेनर मधोमध बंद पडला. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
२ किमीसाठी लागतोय तासभर!
सध्या एक्स्प्रेस वेवर सुमारे ११ ते १२ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, केवळ २ किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. थंडी आणि अन्ना-पाण्याविना लहान मुले व वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
प्रशासनाची भूमिका काय?
प्रशासनाकडून बंद पडलेला सिमेंट कंटेनर बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोंडी कमी करण्यासाठी काही हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येत आहेत. मात्र जोपर्यंत सिमेंट कंटेनर पूर्णपणे हटवला जात नाही, तोपर्यंत वाहतूक मंदावलेलीच राहील, असे दिसून येत आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा टॅन्कर पलटी होवून त्यामधील ज्वलनशील प्रोपेलीन वायूची गळती सुरू झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर महामार्ग पोलीस, रायगड जिल्हा पोलीस दल तसेच फायरब्रिगेड, एनडीआरएफ, बीपीसीएल, हेल्प फाउंडेशन व काही केमिकल एक्सपर्ट हे घटना घडल्यापासून वायू गळती रोखून वाहतुक सुरळित करण्यासाठी प्रयत्न करत होते. गॅस टॅन्करमधील वायू गळती रोखणे हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते तरीदेखील सर्व यंत्रणांनी केमिकल एक्सपर्ट यांच्या मदतीने अथक प्रयत्न करून टॅन्करमधील वायू गळती थांबवून तो सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला.