उरुळी कांचन येथे भीषण अपघात; भरधाव टेम्पोने नागरिकांच्या अंगावर घातली गाडी, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:42 IST2025-07-03T15:42:38+5:302025-07-03T15:42:48+5:30
अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले

उरुळी कांचन येथे भीषण अपघात; भरधाव टेम्पोने नागरिकांच्या अंगावर घातली गाडी, दोघांचा मृत्यू
उरुळी कांचन: उरुळी कांचन परिसरातील तळवडे चौकामध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर दिनांक २ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे टेम्पो चालविल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन टेम्पो चालक शशिकांत रोहिदास पवार (वय २४, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने सदर वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर गाडी घातली. यामध्ये महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) आणि अशोक भीमराव (वय २५, रा. सावली, बिदर) यांचा जागीच मृत्यू झाला.
याव्यतिरिक्त लक्ष्मण बापूराव भारती (वय ६१), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय ६७), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०) आणि भागवत पेरू बनसोडे (वय ४०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी काही जखमींच्या हातपायांना फ्रॅक्चर झाल्याचेही समजते. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा क्रमांक १९२/२०२५ अन्वये बीएनएस कलम २८१, १२५, १२५(अ), १२५(ब), १०५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत. घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी भेट दिली असून पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली.