Dog Attack: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; लोहगावातील ६ वर्षांच्या बालकावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:18 IST2026-04-14T15:17:46+5:302026-04-14T15:18:47+5:30
Dog Attack in Pune: शहरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून मुले साधी घराबाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत. प्रशासनाने तातडीने यांचा बंदोबस्त करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Dog Attack: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; लोहगावातील ६ वर्षांच्या बालकावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे: लोहगाव परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. आता नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. रविवारी (दि.१२) 'आठवडे बाजार' परिसरातील दुर्वांश हर्षद खांदवे या सहा वर्षांच्या चिमुरड्यावर कुत्र्याने भीषण हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महापालिका प्रशासन कोणाच्या बळीची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पुण्यातही शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबर सर्व उपनगरात भटक्या कुत्र्यांचे परिमाण वाढले आहे.
दुर्वांश खांदवे हा संत तुकाराम विद्यालय परिसरात खेळत असताना अचानक काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात दुर्वांशला जबर चावा घेतला आहे. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेमुळे तो प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे.
श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त प्रमाणात झाले आहे. ही कुत्री शाळेत येणाऱ्या मुलांना चावा घेत आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रोज हजारो मुले येतात जातात त्यांच्या जिवांना रोज धोका होत आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी. - हर्षद खांदवे, लोहगाव.
रक्ताळलेली तोंडे अन् १०-१५ कुत्र्यांच्या झुंडी
पुण्यात सध्या १० ते १५ कुत्र्यांच्या टोळ्या वावरताना दिसत आहेत. ही कुत्री दिसेल त्या व्यक्तीवर, विशेषतः लहान मुलांवर आणि दुचाकीस्वारांवर धावून जात आहेत. रात्रीच्या वेळी तर घराबाहेर पडणे कठीण झाले असून, पहाटे कामावर जाणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे सावट आहे.
आमची मुले सुरक्षित नाहीत!
"शहरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुले साधी घराबाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत. प्रशासनाने तातडीने यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा काही दुर्घटना घडली तर प्रशासन दोषी राहील, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या मागण्या
१. महापालिकेच्या श्वान पथकाने तत्काळ शहरात मोहीम राबवावी.
२. हिंसक झालेल्या कुत्र्यांना पकडून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
३. शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवावी. महापालिका प्रशासनाला आता तरी जाग येईल का ? की आणखी एखाद्या दुर्घटनेची प्रशासन प्रतीक्षा करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.