डिंभे धरणातील पाणीसाठा चिंताजनक;आदिवासी भागात पाणीटंचाई तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:05 IST2026-05-16T15:05:24+5:302026-05-16T15:05:54+5:30
आंबेगाव तालुक्यात घोडनदीवर उभारण्यात आलेले डिंभे धरण कुकडी प्रकल्पासाठी महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते.

डिंभे धरणातील पाणीसाठा चिंताजनक;आदिवासी भागात पाणीटंचाई तीव्र
डिंभे : कुकडी प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे डिंभे धरण सध्या गंभीर जलसंकटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मे महिन्याच्या मध्यावरच धरणातील पाणीसाठा केवळ १७.८७ टक्क्यांवर घसरल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वाढते तापमान, बाष्पीभवन आणि डाव्या कालव्यात सुरू असलेल्या आवर्तनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे.
आंबेगाव तालुक्यात घोडनदीवर उभारण्यात आलेले डिंभे धरण कुकडी प्रकल्पासाठी महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते. मात्र यंदा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे धरणातील जलपातळी वेगाने खाली जात आहे. पाटबंधारे विभाग, नारायणगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार धरणाची पाणीपातळी सध्या ६९५.१८ मीटरवर आली आहे.
सध्या डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू असून वीज निर्मिती केंद्रातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणातून तब्बल ६९५ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.
धरणाच्या बॅकवॉटर परिसरातही परिस्थिती गंभीर बनली आहे. काही ठिकाणी पाणलोट क्षेत्र पाच किलोमीटरपर्यंत रिकामे झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळी दिसणारे पाणी संध्याकाळपर्यंत आणखी मागे सरकत असल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका धरणाच्या आतील आदिवासी गावांना बसत असून अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.