इंधन दरवाढीचा फटका; फळे, भाजीपाल्याचे दर गगनाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 11:08 IST2026-05-17T11:08:26+5:302026-05-17T11:08:39+5:30
- फळे, भाजीपाला, कडधान्य महागणार; वाहतूक भाडे वाढले

इंधन दरवाढीचा फटका; फळे, भाजीपाल्याचे दर गगनाला
पुणे : इंधन दरवाढीचा थेट फटका ग्राहकांना बसत असून फळे, भाजीपाला, कडधान्य घेऊन येणाऱ्या वाहनांचे भाडे वाढणार असल्यामुळे दरात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवीत आहेत. त्यामुळेे ग्राहकांवर महागाईचा ताण येणार असून आर्थिक नियोजनही कोलमडणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.
या दरवाढीमुळे कडधान्य आणि शेतीमाल घेऊन बाजारात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांचे भाडे वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम दरवाढीवर होणार असल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दर वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकच्या दराने कडधान्य, फळे, भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे. वाढलेल्या दराचा खिशावर ताण येणार असल्यामुळे ग्राहकांना आता खरेदी करताना विचार करावा लागणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे महागाईने कबरडे मोडत आहे.
इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. किरकोळ विक्रेत्यांचा वाहतूक खर्च वाढणार असल्यामुळे ते कडधान्य, फळे, भाजीपाल्याची अधिकच्या दराने विक्री करावी लागत आहे.
दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च काढणार आहे. भाडे वाढणार असल्यामुळे वाढलेल्या भाड्याचा शेतकऱ्यांसह माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा खर्च वाढणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजीपाला महाग होणार आहे. फळे व भाजीपाल्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - विलास भुजबळ, ज्येष्ठ अडते, मार्केटयार्ड.
खर्चामुळे दरही वाढणार
मार्केटयार्डातील भुसार विभागात राज्यासह परराज्यातून माल येत असतो. इंधनाचे दर वाढल्यामुळे भाड्यातही मोठी वाढ होणार आहे. ज्या प्रमाणात वाहतूक खर्च वाढेल, त्या प्रमाणात भुसार मालाचे दर वाढतील. विशेषत: ज्या-ज्या मालाची वाहतूक होते, त्या सर्व मालाचे दर वाढणार असल्याने त्यांचा फटका व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही फटका बसणार आहे. - अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी, मार्केटयार्ड