कांदा चाळीतील ६०० गोणी टाकला युरिया; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:54 IST2026-05-17T12:53:51+5:302026-05-17T12:54:25+5:30
बाजारात कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता.

कांदा चाळीतील ६०० गोणी टाकला युरिया; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
नारायणगाव : येडगाव-नारायणगाव रस्त्यावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत साठवलेल्या कांद्यात अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने तब्बल ६०० गोणी कांद्याचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी सावता चिमाजी कोल्हे यांच्या मालकीच्या कांदा चाळीत हा प्रकार घडला असून याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती हेमंत कोल्हे यांनी दिली.
सावता चिमाजी कोल्हे यांच्या अडीच एकर शेतीमध्ये श्रीहरी बनकर यांनी अर्ध्या वाट्याने कांद्याची लागवड केली होती. बाजारात कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी शेतकरी कांदा चाळीजवळ गेले असता परिसरात युरिया टाकलेला आढळून आला. संशय आल्याने कांदा चाळ उघडून पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने चाळीच्या वर चढून साठवलेल्या कांद्यात ओला युरिया टाकल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. कांदा मालकाचा कोणाशीही वाद नसताना हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत साठवलेल्या कांद्याचे नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.