दौंड : शहरातील नवगिरेवस्ती येथे बर्याच भागांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. सिद्धार्थनगरला रात्री ८ वाजता, तर भीमनगरला रात्री १ वाजता पाणीपुरवठा होतो. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त असून, रात्री-अपरात्री महिलांसह कुटुंबीयांना जागरण करून पाणी भरावे लागत आहे. दौंड शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात कमी दाबाने, तर काही भागात पाणीपुरवठाच होत नाही. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नगरसेवक राजू बारवकर यांनी मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांच्याकडे केली आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी साठेल असा तलाव नगरपालिकेचा आहे. तरीदेखील गेल्या वर्षी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी नगरपालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला होता. गेल्या दोन वर्षांत शहरात जलवाहिन्या टाकणे, जलवाहिन्या दुरुस्त करणे, फिल्टर टँकचे नूतनीकरण करणे या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, तरीदेखील शहरातील काही भागात पाण्याची समस्या कायम आहे. नगर परिषदेचा कारभार एकाधिकारशाही पद्धतीने केला जात आहे. कुणालाही विश्वासात घेतले जात नाही, असे बारवकर यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)
दौंडकरांची पिण्याच्या पाण्याची ‘बोंब’!
By admin | Updated: May 25, 2014 05:00 IST