खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:24 IST2025-06-25T10:24:46+5:302025-06-25T10:24:57+5:30
खेड तालुक्यातील आठ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात आजमितीला ३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी ७.०८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता

खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चासकमान धरणाअतंर्गत आरळा नदीवरील दीड टीएमसी क्षमतेचे कळमोडी धरण तब्बल महिनाभर अगोदरच १०० टक्के भरून सांडव्यावरून मंगळवार, दि. २४ जून रोजी सायंकाळी ६:१५ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. आरळा नदीकाठच्या ग्रामस्थांनी सावध राहण्याचे आवाहन चासकमान पाटबंधारे विभागाने केले आहे.
यंदा अवकाळी पावसाने १० मेपासून खेड तालुक्याला चांगलेच झोडपून काढल्याने उन्हाळी बाजरी पिकासह, आंबे, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर पश्चिम भागातील भात उत्पादक क्षेत्रात भात रोपे तयार करण्यासाठी रान भाजणीची कामे खोळंबली गेली. शेतजमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामासह बटाटा लागवडी खोळंबून बटाटा बियाणे सडण्याच्या मार्गावर आल्याने अगोदरच उन्हाळी पिके नेस्तनाबूत होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता खरीप हंगामातील पेरण्यांच्या कामावर संक्रांत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
संपूर्ण मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना २६ मेला मान्सूनचे आगमन दमदार झाल्याने पावसाने उघडीप न दिल्याचा परिणाम शेती क्षेत्रावर झाला. दुसरीकडे उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईच्या समस्या सुटून मे महिन्यातच शासकीय टँकर बंद झाले, तर तालुक्यातील बंधारे, विहिरी, पाझर तलाव भरले तर ओढे, नाले, धबधबे दुथडी भरून गेल्याने नद्यांना पूर येऊन गेले. तालुक्यातील तीन धरणांतील पाणीसाठा तळाला गेला असताना धरणात पाण्याचा येवा वाढल्यामुळे पाणीटंचाईचे जलसंकट निवारण मे महिन्यातच होऊ लागल्याचे पाहावयास मिळाले.
खेड तालुक्यातील आठ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात आजमितीला ३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी ७.०८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता. धरणक्षेत्रात आतापर्यंत २७१ मिमी एकूण पर्जन्य पडल्याची नोंद झाली. ८.१४ टीएमसी क्षमतेच्या भामाआसखेड धरणात आजमितीला ३१.६८ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी १४.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरण क्षेत्रावर १८६ मिमी एकूण पावसाची नोंद झाली.