महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत का? खरात प्रकरणावरून अंधारेंचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:23 IST2026-04-15T15:22:50+5:302026-04-15T15:23:37+5:30
खरात प्रकरणावरून एसआयटीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तपासात पारदर्शकता नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत का? खरात प्रकरणावरून अंधारेंचा सरकारला सवाल
पुणे: राज्यातील खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 16-17 तारखेला खरातला अटक झाल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली होती, मात्र एक महिना उलटूनही तपासात ठोस प्रगती दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांकडून माध्यमांमध्ये अधिक चर्चा होत असून प्रत्यक्ष काम कमी असल्याचेही त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री गंभीर नसल्याचा सवाल उपस्थित करत, अंधारे यांनी राज्यात त्यानंतरही अनेक प्रकरणे समोर येत असल्याचे सांगितले. परतवाडा प्रकरणातील आरोपीवर बुलडोझर कारवाई केली जाते, मात्र खरात प्रकरणात तसे होत नसल्याची तुलना करत त्यांनी खरात फार्महाऊस तसेच चाकणकर यांच्या मालमत्तेवरही कारवाई करण्याची मागणी अंधारे यांनी केली.
सुनेत्रा पवार आणि अदिती तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, महिला नेत्या म्हणून त्यांनी काय केले असा सवाल अंधारे यांनी केला. प्रतिभा चाकणकर यांना बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोप करत, त्यांच्या अटकेची मागणीही त्यांनी केली. तसेच नोटीस नसताना प्रतिभा चाकणकर चौकशीसाठी का गेल्या, यावरही त्यांनी शंका उपस्थित केली.
अमरावतीप्रमाणेच अशोक खरात प्रकरणातही समान न्याय देण्याची मागणी करत, केसरकर आणि एकनाथ शिंदे यांचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले. एसआयटीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तपासात पारदर्शकता नसल्याचा आरोप केला. मुंबईतील रेव्ह पार्टी प्रकरणावरूनही त्यांनी सरकारवर टीका करत, ड्रग्स आणि लैंगिक प्रकरणांवर कारवाई होत नसल्याचे म्हटले. तसेच काही प्रकरणांमध्ये संस्थांना वाचवण्यासाठी व्यक्तींना बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकूणच, खरात आणि संबंधित प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.