दीपक जाधव, पुणे - अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत मिळणारे धान्य, राजीव गांधी विमा योजना तसेच शैक्षणिक सवलती यांसह इतर अनेक सवलतींसाठी अत्यंत आवश्यक असणारे केशरी रेशनकार्ड मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठा आटापिटा करावा लागत आहे. परिमंडळ कार्यालयांमध्ये रेशनकार्डांचे काम घेऊन नागरिक गेले असता त्यांना केशरीऐवजी शुभ्र रेशनकार्डच घेण्याची सक्ती केली जात आहे. शहरातील अन्नधान्य विभागाच्या ८ परिमंडळ कार्यालयातून रेशनकार्डांचे वितरण करण्यात येते. उत्पन्नगटानुसार केशरी, शुभ्र व पिवळ्या रेशनकार्डांचे वाटप केले जाते. मात्र, केशरी रेशनकार्ड काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून आलेल्या तोंडी आदेशामुळे वितरण बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रेशनकार्डवर ५९ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या सर्वांना अन्नधान्य सुरक्षा कायद्यांतर्गत अन्नधान्य देण्यात येते, त्यामुळे केशरी रेशनकार्ड असलेल्यांनाही त्याअंतर्गत अन्नधान्य मिळू शकत आहे. मात्र, केशरी रेशनकार्डअभावी गोरगरिबांना लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शैक्षणिक प्रवेशासाठी पिवळे व केशरी या दोन प्रकारचेच रेशनकार्ड याकरिता चालते. राज्य शासनाने सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी विमा योजनेअंतर्गतही पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्डची आवश्यकता असते. याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, केशरी रेशनकार्डांचे वितरण करणे बंद करण्यात आलेले नाही. केवळ नागरिकांचे उत्पन्न तपासूनच त्यांना केशरी रेशनकार्ड वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्यांना केशरी रेशनकार्ड वितरीत केले जाते, मात्र सध्या एक लाखांच्या आत उत्पन्न असलेले कोणी गरीब नागरिक शहरात राहिलेच नसल्याचे अन्नधान्य वितरण कार्यालयाने ठरवून टाकणे चुकीचे आहे, तरी त्यांनी तातडीने केशरी शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी लोकहित फाउंडेशनने निवेदनाद्वारे केली आहे, अन्यथा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केशरी रेशनकार्डसाठी अडवणूक
By admin | Updated: May 26, 2014 05:08 IST