Khadakwasla Dam: खुशखबर! पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात १२ टीएमसी पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:28 IST2025-06-25T10:27:19+5:302025-06-25T10:28:40+5:30
जूनच्या अखेरीसच शहराच्या पाण्याची चिंता मिटल्याने महापालिका प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला

Khadakwasla Dam: खुशखबर! पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात १२ टीएमसी पाणीसाठा
पुणे : महापालिका अधिकृतरित्या खडकवासला धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी सुमारे साडेअकरा टीएमसी पाणी उचलते. त्यानुसार यंदा पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून, खडकवासला प्रकल्पामधील चारही धरणांमध्ये एकूण १२ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. जूनच्या अखेरीसच शहराच्या पाण्याची चिंता मिटल्याने महापालिका प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या १५ वर्षांत, असे पहिल्यांदाच घडले असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. केवळ महिनाभरात झालेल्या पावसामुळे चारही धरणांत सुमारे सव्वासहा टीएमसी पाणी जमा झाले आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत सध्या सुमारे १२ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. महापालिका पुणे शहरासाठी जलसंपदा विभागाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार दरवर्षी साडेअकरा टीएमसी पाणी उचलते. त्यानुसार शहराच्या मागणीपेक्षा अर्धा टीएमसी जादा पाणीसाठा तयार झाला आहे. साधारण महिनाभरापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरीस अर्थात २७ मेपासून धरणांत पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. या दिवशी एकूण पाणीसाठा ५.७३ टीएमसी इतका होता, तर २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चारही धरणांत १२ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे महिनाभरात एकूण सव्वासहा टीएमसी जादा पाणीसाठा जमा झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (दि. २४) सकाळी सहावाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत खडकवासला धरण क्षेत्रात ९ मिलीमीटर, पानशेतमध्ये ६, वरसगावमध्ये ७०, तर टेमघरमध्ये ११२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे चारही धरणांचा पाण्याची आवक वाढली. परिणामी जलसंपदा विभागाने सोमवारी (दि. २३) खडकवासला धरणातून सुरू असलेला ६८४ क्युसेक वाढवून सकाळी ३ हजार ८८३ क्युसेक करण्यात आला. त्यानंतर पाऊसही सुरूच राहिल्याने विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता विसर्ग ७ हजार ७०० क्युसेक करण्यात आला. तर, सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणात १२ मिलिमीटर, पानशेतमध्ये ५३, वरसगावमध्ये ५२, तर टेमघर धरण परिसरात ३४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर चारही धरणांमध्ये एकूण ६६१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक होत होती. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गातही वाढ करण्यात येईल, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली. दरम्यान खडकवासला धरणातून विसर्गाद्वारे आतापर्यंत १.७० टीएमसी अर्थात एक खडकवासला धरण पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.
पाऊस समाधानकारक होत असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची गरजही पूर्ण करता येईल. पुढील काळात पाऊस असाच राहण्याचा अंदाज असल्याने धरणे लवकर भरतील.- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा झालेला पाणीसाठा
धरण--पाऊस (मिमी)--टीएमसी--क्षमता (टक्के)
खडकवासला १२-१.३१--६६.१९
पानशेत ५३--३.९१--३६.७४
वरसगाव ५२--५.८२--४५.३६
टेमघर ३४--०.९०--२४.२३
एकूण ११.९३ टीएमसी ४०.९४ टक्के
गेल्या वर्षाची स्थिती
एकूण ३.५९ टीएमसी--१२.३२ टक्के
खडकवासला धरणातून यापूर्वी पहिल्यांदा करण्यात आलेला विसर्ग
वर्ष--तारीख--विसर्ग (क्युसेक)
२०२०--१२ ऑगस्ट--४२८
२०२१--२२ जुलै--२४६६
२०२२--११ ऑगस्ट--३४२४
२०२३--२५ जुलै--४२८
२०२४--२३ जुलै--२०००
२०२५--१९ जून--१९२०