पालकांसाठी आनंदवार्ता! आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ; १ कि.मी.ची अट शिथिल, आता ३ व ५ किमीपर्यंत शाळांचे पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:50 IST2026-03-16T18:49:13+5:302026-03-16T18:50:03+5:30
जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसेल, तर त्या विद्यार्थ्याला अधिक अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल

पालकांसाठी आनंदवार्ता! आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ; १ कि.मी.ची अट शिथिल, आता ३ व ५ किमीपर्यंत शाळांचे पर्याय
पुणे : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची एक किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली असून आता पालकांना तीन व पाच किलोमीटरपर्यंतच्या शाळांचे पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. तसेच अर्जामध्ये दुरुस्ती किंवा नवीन अर्ज भरण्यासाठी २५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धी परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आरटीई प्रवेशासाठी पालकांना केवळ निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरातील शाळाच निवडण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवित एक किलोमीटरची सक्ती योग्य नसल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने असे नमूद केले की, जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसेल, तर त्या विद्यार्थ्याला अधिक अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे शासनाने नियमांमध्ये सुधारणा करून पालकांना अधिक अंतरावरील शाळांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले.
या आदेशानुसार शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठीच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्राधान्याने एक किलोमीटर, त्यानंतर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरातील शाळांचे पर्याय पालकांना निवडता येणार आहेत. तसेच १६ मार्च २०२६ पर्यंत ज्या पालकांनी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत, त्यांना अर्ज ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारित नियम लागू करत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिक अंतरावरील शाळांचे पर्याय उपलब्ध झाल्याने आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.