नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:16 IST2025-08-22T11:15:49+5:302025-08-22T11:16:39+5:30
वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला.

नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना
बावडा: वडापुरी (ता.इंदापूर) येथील दोघांचा कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवर पिंपळनेरजवळ असलेल्या कालव्यात चार चाकी पडून झालेल्या अपघातातमृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर उत्तम बंडगर व अनिल हनुमंत जगताप (तोबरे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सुरेश राजाराम जाधव (वय 49 वर्षे, रा. वडापुरी ता.इंदापूर) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार (दि.21) रोजी फिर्यादी व त्यांच्या गावातील शंकर उत्तम बंडगर (वय 44 वर्षे) व अनिल हनुमंत जगताप (वय 55 वर्षे) असे तिघे जण चारचाकी वाहन (क्रमांक MH42 BE 8954) मधून धाराशीव येथून वडापुरी ता.इंदापूर कडे परतत होते. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी टेंभुर्णी मार्गावर पिंपळनेर लगत चालक बंडगर यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन लगतच्या असलेल्या कॅनॉलला लावलेल्या लोखंडी गार्डला घासुन कॅनॉल मध्ये पडली. त्यावेळी फिर्यादी हे गाडीचा साईडचा दरवाजा उघडुन गाडीतुन कसेबसे बाहेर आले. यावेळी गाडीचे इतर दरवाजे लॉक झाल्याने इतर दोघांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. यामध्ये बराच वेळ गेला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरने ओढुन गाडी बाहेर काढली. यावेळी गाडीत असलेलं शंकर उत्तम बंडगर, अनिल हनुमंत जगताप यांना कुर्डवाडी येथील दवाखान्यात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला.