Sharad Pawar: १-२ दिवसांची बचत नको, ताफा सोडणाऱ्यांनी सातत्य दाखवावं; शरद पवारांची सूचना, सर्वांनाच काळजी घेण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:51 IST2026-05-14T17:51:03+5:302026-05-14T17:51:36+5:30
रुपयाची किंमत का घसरते याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे .देशातील आर्थिक परिस्थितीकडे सरकारने अधिक संवेदनशीलतेने पाहावे

Sharad Pawar: १-२ दिवसांची बचत नको, ताफा सोडणाऱ्यांनी सातत्य दाखवावं; शरद पवारांची सूचना, सर्वांनाच काळजी घेण्याचं आवाहन
पुणे : पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची देशभर चर्चा होत असून, ते गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठे नेते शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आणि सरकारने जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अनेक मंत्री आणि नेते प्रतीकात्मक पद्धतीने दुचाकी किंवा पायी प्रवास करत आहेत. एका मंत्र्याकडे पूर्वी १७ गाड्या होत्या, त्या आता ८ वर आणल्याचे ऐकून धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, रुपयाची किंमत का घसरते याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे .देशातील आर्थिक परिस्थितीकडे सरकारने अधिक संवेदनशीलतेने पाहावे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही निर्णय घेतले गेले, मात्र निवडणूक काळात हे गांभीर्य दिसले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
सोनं खरेदी न करणे चुकीचे
पंतप्रधान मोदी यांनी सोनं खरेदी करू नका असे आवाहन केले आहे. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, सोनं खरेदी करणे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. मात्र अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी इतर अनेक पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य केले तर आर्थिक मंदी टाळता येऊ शकते. सध्या परिस्थिती चिंताजनक असली तरी मंदी निश्चित येईल असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे किती दिवस टिकते ते पाहावे लागेल
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात जाण्यासाठी दुचाकीवरून प्रवास केला. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, काही नेत्यांचा दुचाकी प्रवास हा फक्त प्रतीकात्मक आहे का, हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस दुचाकीवरून मंत्रालयात आले, पण हे किती दिवस टिकते ते पाहावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
जागतिक परिस्थितीमुळे महागाई वाढली
महागाईसाठी थेट सरकारला दोष देणे योग्य नाही. युद्धामुळे तेलाचे दर वाढले असून जागतिक परिस्थितीमुळे महागाई वाढल्याचे त्यांनी सांगितले.