उपमहापौरपद दिले पण सन्मान दिला जात नाही; पुण्यात भाजप आणि आरपीआयमध्ये अंर्तगत वाद सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:27 IST2026-03-17T20:27:50+5:302026-03-17T20:27:59+5:30
अनेकदा बैठका होऊन गेल्यानंतर ‘तुम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते का?’ अशी विचारणा महापौरांकडून उपमहापौरांना होते

उपमहापौरपद दिले पण सन्मान दिला जात नाही; पुण्यात भाजप आणि आरपीआयमध्ये अंर्तगत वाद सुरू
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता आल्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवत भाजपने आरपीआयला उपमहापौरपद दिले. काही बैठकांना महापौरांच्या शेजारी उपमहापौरांची बसण्याची व्यवस्थाही केली जात नाही. शहरातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी जागा न ठेवल्याने अनेक कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांमध्ये बसून साक्षीदार झालो. या पदापर्यंत संघर्ष करत आलो. यापुढील काळातही संघर्ष करत राहणार आहे. उपमहापौर पदासाठी दिला जाणारा सन्मान दिला जात नाही, अशी खदखद उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यातील अंर्तगत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.
उपमहापौरपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी योग्य मान दिला जात होता. मात्र आता त्या सन्मानाचा विसर पडल्याची तक्रार महापालिकेचे उपमहापौर वाडेकर यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धांच्या निमित्ताने उपमहापौरपदाला जाणीवपूर्वक डावलले जात आहे. महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील एक स्पर्धा औंध-बोपोडी या प्रभागात आयोजित करूनही त्या कार्यक्रमासाठी उपमहापौर म्हणून डावलण्यात आल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. हे प्रकार नजरचुकीने होतात की जाणीवपूर्वक हेच समजत नाही, असेही वाडेकर यांनी सांगितले.
महापालिकेत सत्ताधारी झालेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या नगरसेवकांसाठी उपमहापौरपद सोडले असले तरी या पदासाठी असलेला सन्मान मात्र भाजपकडून मिळत नसल्याचे समोर आले आहे. महापौर कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांना उपमहापौर यांना निमंत्रण पाठविले जात नाही. अनेकदा बैठका होऊन गेल्यानंतर ‘तुम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते का?’ अशी विचारणा महापौरांकडून होते. महापौर कार्यालयातील संबधित व्यक्तींशी बोलून माहिती घेतली जाईल, असे सांगत महापौरांकडून केवळ समजूत काढली जाते. मात्र त्यानंतरही पुन्हा तशाच पद्धतीचे प्रकार घडत असल्याचे उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.