छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ! पुढील १५ दिवसांत मिळणार शेतकऱ्यांना मोबदला, परतावा एरोसिटीतच देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:04 IST2026-02-24T12:04:30+5:302026-02-24T12:04:39+5:30
शेतकऱ्यांना देण्यात येणारा १० टक्के विकसित जमिनीचा परतावा हा एरोसिटीमध्येच देण्यात येणार असून तीन हजार एकर क्षेत्रात विमानतळ उभारण्यात येणार आहे

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ! पुढील १५ दिवसांत मिळणार शेतकऱ्यांना मोबदला, परतावा एरोसिटीतच देणार
पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या ३ हजार एकर जमिनीसाठी ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसांत या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येणारा परतावा हा एरोसिटीमध्येच देण्यात येईल. ही एरोसिटी ही विमानतळाच्या शेजारीच उभारण्यात येणार असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.
डुडी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “गेल्या १० तारखेला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार राज्य सरकारने विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या सहा हजार कोटींच्या निधीसाठी कर्ज उभारणीस मान्यता दिली आहे. हे कर्ज उभारणीसाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना केली असून त्यात एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन संस्थांमध्ये सिडकोचा सर्वाधिक भाग असणार असून या संदर्भातील अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी कर्ज उभारणीस आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या निधीतून मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.”
दरम्यान, या विमानतळासाठी केवळ मोजणीसाठी संमती दिली होती. भूसंपादनाची संमती देण्यात आली नव्हती, असा काही शेतकऱ्यांचा दावा होता. मात्र, भूसंपादनासाठीच जमिनीची मोजणी देण्यात येते. त्यामुळे एकूण क्षेत्रापैकी सुमारे ९६ टक्के क्षेत्राची संमती मिळालेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना देण्यात येणारा १० टक्के विकसित जमिनीचा परतावा हा एरोसिटीमध्येच देण्यात येणार असून तीन हजार एकर क्षेत्रात विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याशेजारील क्षेत्रामध्ये एरोसिटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची आवश्यक काही जमीन ताब्यात आली आहे. काही जमीन अजून ताब्यात आलेली नसून त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांना एरोसिटीतच परतावा मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.