इंदापूर तालुक्यातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीस रद्द करा - दत्तात्रय भरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:47 IST2026-02-26T10:47:42+5:302026-02-26T10:47:50+5:30
संपादित केलेली, परंतु त्या कामासाठी वापरात नसलेली जमीन मूळ मालकाला परत किंवा भाडे करारावर द्यावी, असा नियम आहे

इंदापूर तालुक्यातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीस रद्द करा - दत्तात्रय भरणे
पुणे: इंदापूर मतदारसंघातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना भीमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन विखे यांनी दिल्याचे भरणे म्हणाले.
भरणे यांनी विखे यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. भरणे म्हणाले, ‘उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड, कर्जत तालुक्यातील ८१ गावांनी त्याग केला आहे. नाममात्र किमतीमध्ये हजारो शेतकऱ्यांची शेती संपादित केलेली आहे. मात्र, या धरणग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसनदेखील झालेले नाही. अनेक उजनी धरणग्रस्त शेतकरी, गावे नागरी सुविधापासून वंचित आहेत. असे असताना, उजनी धरण क्षेत्राजवळील अतिरिक्त जमिनी पीपीपी तत्त्वावर ४९ वर्षे करारावर देण्यात येणार आहे. याला धरणग्रस्तांचा विरोध आहे.’ संपादित केलेली, परंतु त्या कामासाठी वापरात नसलेली जमीन मूळ मालकाला परत किंवा भाडे करारावर द्यावी, असा नियम असताना हा निर्णय म्हणजे विसंगती असून, ही जमीन मूळमालकांना परत देण्यासंदर्भात योग्य निर्णय व्हावा, अशी विनंती भरणे यांनी विखे यांच्याकडे केली. त्यावर विखे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे भरणे म्हणाले.