Baramati bypoll election 2026: २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने सुनेत्रा पवारांचा विजय; तब्बल ६४ वर्षांनंतर बारामतीचे नेतृत्व महिलेकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:02 IST2026-05-04T18:01:52+5:302026-05-04T18:02:02+5:30
Baramati bypoll election 2026 १९६२ च्या निवडणुकीत मालतीबाई शिरोळे यांनी विजय मिळवत बारामतीचा आवाज विधानसभेत पोहोचवला होता.

Baramati bypoll election 2026: २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने सुनेत्रा पवारांचा विजय; तब्बल ६४ वर्षांनंतर बारामतीचे नेतृत्व महिलेकडे
पुणे: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत राजकीय वर्तुळात नवा इतिहास घडवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत बारामतीच्या मतदारांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर विश्वास दाखवला आहे.
या विजयासह सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. याआधी १९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे (माई) यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत बारामतीचे प्रतिनिधित्व केले होते. तब्बल ६४ वर्षांनंतर पुन्हा एकदा महिला नेतृत्व बारामतीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.
१९६२ च्या निवडणुकीत मालतीबाई शिरोळे यांनी विजय मिळवत बारामतीचा आवाज विधानसभेत पोहोचवला होता. त्या काळात सहकार चळवळ, ग्रामीण विकास आणि महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी १९६७ पर्यंत मतदारसंघाचे नेतृत्व केले.
यानंतर बारामतीच्या राजकारणात मोठा टप्पा गाठला तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आगमनाने. १९६७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामतीतून विजय मिळवत आपल्या दीर्घ आणि प्रभावी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघावर पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले.
अजित पवार यांनीही या मतदारसंघातून अनेकदा विजय मिळवत आपली मजबूत पकड सिद्ध केली होती. त्यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मिळवलेला प्रचंड मताधिक्याचा विजय हा सहानुभूतीसह संघटनशक्ती आणि स्थानिक विकासाच्या मुद्यांचा परिणाम मानला जात आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर बारामतीच्या विकासाची जबाबदारी आली असून, आगामी काळात त्या कोणते निर्णय घेतात आणि मतदारांच्या अपेक्षा कशा पूर्ण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.