School Fees: फी वाढीचा मनमानी कारभार; खासगी शाळांना लगाम घालणार, नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:10 IST2026-04-07T11:09:51+5:302026-04-07T11:10:05+5:30
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार २ वर्षांत १५ टक्क्यांपेक्षा जास्त फी वाढवता येत नाही. तरीही काही शाळा या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे

School Fees: फी वाढीचा मनमानी कारभार; खासगी शाळांना लगाम घालणार, नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार
पुणे : खासगी शाळांकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव शुल्कामुळे पालकांमध्ये असंतोष वाढत असून, या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण विभाग सक्रिय झाला आहे. नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन फीवाढ करणाऱ्या शाळांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी दिले आहे. फीवाढीबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दोन वर्षांत १५ टक्क्यांपेक्षा जास्त फी वाढवता येत नाही. तरीही काही शाळा या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान एका पालकाने सांगितले की मुलीला खासगी शाळेत प्रवेश घेताना पूर्ण शुल्क भरून घेतले जात आहे. मात्र, नंतर आरटीईअंतर्गत दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाल्यास भरलेली फी परत मिळणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. या गोसावी म्हणाले, उच्च शिक्षण क्षेत्रात फी परताव्याचे धोरण अस्तित्वात आहे. त्याच धर्तीवर शालेय शिक्षणातही अशी व्यवस्था लागू करता येईल का?, याचा विचार सुरू आहे.
दरम्यान, काही शाळांमध्ये फीवाढीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. वार्षिक शुल्क ५५ हजार रुपयांवरून थेट ७२ हजारांपर्यंत वाढवण्यात आले आहे. अशा प्रकारच्या वाढीला नियमांची पायमल्ली मानली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, ज्या ठिकाणी नियमबाह्य फीवाढ होत आहे, त्या ठिकाणी लेखी तक्रार करावी. प्राप्त तक्रारींची चौकशी करून संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल. खासगी शाळांनी ठरवलेल्या मर्यादेतच शुल्कवाढ करावी, अन्यथा कारवाई अटळ आहे, असा स्पष्ट इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे.